पुणे – अतिक्रमणे, वणवे, बेकायदा वृक्षतोड, मद्यपी, वन्य प्राणी आणि एकूणच मानवी हस्तक्षेप या सगळ्या आव्हानांना वनविभागाला सामोरे जावे लागते. त्यामुळे वनविभागाला अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने सोलापूर वनपरिक्षेत्रासाठी अतिरिक्त पदांची मागणी केली आहे. नागपूर येथील मुख्य कार्यालयाला त्यांनी ही मागणी कळवण्यात आली आहे.
सोलापूर वनपरिक्षेत्र हे पुणे विभागाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे पुणे विभागाने ही मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपस्थितीमुळे वनविभागाने सोलापुरातील वनक्षेत्रात या आधीही अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यासाठी मर्यादित पदे देण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा अतिरिक्त पदांची मागणी करण्यात आली आहे.
सोलापूरात वन परिक्षेत्रात सध्या वन कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असून दर तीन ते पाच गावांमागे एकच वनरक्षक उपलब्ध आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आली. या भागामध्ये वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपस्थितीबरोबर वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमण, बेकायदा वृक्षतोड या सह अनेक समस्या आहेत.
याशिवाय सगळ्यात महात्त्वाचे म्हणजे सोलापूर वनपरिक्षेत्रातील नान्नज येथे अतिशय दुर्मिळ ठरलेल्या माळढोक पक्षाचे अभयारण्य आहे. याशिवाय या भागात नष्ट होत चाललेली जैवविविधता पुनरुज्जीवित करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी देखील प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठीही मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
समस्या सुटण्याला होणार मदत
मानव आणि वन्यजीव संघर्ष हा तर सध्या ऐरणीवरचा विषय आहे. येथे बिबट्या, तरस, काळवीट यांची संख्या वाढली आहे. ते मानवी वस्तीत घुसतात हा तर विषय आहेच परंतु हे प्राणी रस्त्यावर आल्यावर अपघात होतात आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो. अशावेळी कॉल आल्यानंतर रिस्पॉन्स टायमिंग हा महत्त्वाचा विषय असतो. मनुष्यबळ नसल्याने कमी कालावधीत स्पॉटवर पोहोचणे अवघड होते. जर मनुष्यबळ उपलब्ध झाले तर या सगळ्या समस्या सुटण्याला मदत होणार आहे.