पुणे – दुष्काळग्रस्त गावातील पाण्याचा प्रश्न सुटावा, प्रदूषणाचा विळखा कमी व्हावा आणि सर्व समाजात एकजुटता वाढू दे, असे साकडे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विठूरायाला घातले. पुण्यातील निवडुंगा विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी यांची सर्व धार्मिक विधी व महापूजा संपन्न झाली. यावेळी महिला वारकऱ्यांच्या समवेत गळ्यात टाळ घेत भजनात रंगल्या होत्या.
ऐतिहासिक वारसा असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरातील विठ्ठलाच्या गाभाऱ्याला चांदीची प्रभावळ स्वखर्चातून देणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच केंद्रात नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अगामी निवडणुका पुन्हा जिंकून मोदी आणि शिंदे यांना संधी मिळावी, अशी प्रार्थना केल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त झेलम जोशी, निवडुंग विठोबा मंदिराचे पुजारी रवींद्र पाधे, विश्वस्त किशोर बाबर, ऍड. अरुण स्वामी यासह शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.