– संतोष वळसे पाटील
मंचर -आंबेगाव तालुक्यात 21 ग्रामपंचायतींपैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असल्यामुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण थंडीच्या काळात चांगलेच गरम झाले आहे. उमेदवारांनी निवडणूक जिंकण्यासाठी वॉर्डनिहाय रणनीती आखली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट बनवून प्रचारास सुरुवात केली आहे. वॉर्डमधील कार्यकर्त्यांचा वाढदिवस स्टेटसला ठेवून आवर्जून केक कापून त्यांना आपलेसे करण्यात प्रयत्न करण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत.
नागापूर, डिंभे खुर्द, तळेघर, चिखली व काही जागा रिक्त असल्याने आहुपे अशा 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 16 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी घोडेगाव, साल, आंबेदरा, आमोंडी, गंगापूर खुर्द, चिंचोडी, कळंब, पारगाव तर्फे खेड, मेंगडेवाडी, भावडी, नारोडी, रांजणी या 12 गावांतील सरपंचपदासाठी प्रत्येकी 2 उमेदवार उभे आहेत. निघोटवाडी, चांडोली बुद्रुक, धामणी या तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी प्रत्येकी 3 उमेदवार, गोहे खुर्द सरपंचपदासाठी 5 उमेदवार असे एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान 18 डिसेंबर सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 यावेळेत होणार असुन मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी लागणार आहे.
आंबेगाव तालुक्यात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णू हिंगे, शिंदे गटाचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुनील बाणखेले, अरुण गिरे, भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, संपर्क प्रमुख जयसिंगराव एरंडे,
तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सुरेश भोर, अविनाश राहणे, राजाराम बाणखेले, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 21 ग्रामपंचायतीच्या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते लक्ष ठेवून असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकण्यासाठीसाठी मोठी रणनीती गावपुढारी ठरवित आहेत.
उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार यादी गोळा करून आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत, यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते, याचा अंदाज घेत उमेदवारी अर्ज भरले आहेत. गावातील भावकीच्या बैठका मतदानासाठी घेण्याची तयारी पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात किंवा ग्रामपंचायतीत मतदार याद्या घेण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत.
मोठा महसूल देणाऱ्या ग्रामपंचायतींकडे लक्ष
ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर लगेचच पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि इतर संस्थाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा परिणाम पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर होऊ शकतो. यामुळे गावातील पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत ताब्यात घ्यायचीच हा चंग बांधला आहे. प्रामुख्याने मोठी महसूल असणारी घोडेगाव, कळंब, चांडोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.
61 मतदार केंद्रे, 41 हजार 251 मतदार
या निवडणुकीत मतदार केंद्रांची संख्या 61 असणार असून त्यात महिला मतदार 20723, पुरुष मतदार 21528 असे एकूण मतदार 42251 आहेत.