चिंबळी -मागील काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढला आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर दिसून येत आहे. तहान भागविण्यासाठी शहरातील रस्त्यांच्या कडेला रसवंती गृहे सुरू झाली असून आपल्या घुंगराच्या आवाजाने नागरिकांना जणू साद घालत असल्याचे चित्र दिसत आहे.
ऊन, प्रचंड उकाडा, घशाला सतत पडणारी कोरड यामुळे शहरात जागोजागी थंडपेयांना मागणी वाढली आहे. यामुळे नागिराकंची पावले शीतपेय गृहांकडे वळू लागली आहेत. लिंबू सरबत, उसाचा रस व कोकम सरबतला अधिक पसंती आहे. शीतपेयामध्ये थंड पाणी, लिंबूसोडा, इतर कोल्ड्रिंकची मागणी नेहमीपेक्षा वाढली आहे.
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात शीतपेयाची जास्त मागणी असते. मात्र, फेब्रुवारीमध्येच हा उकाडा जाणवू लागला आहे. तर बच्चेकंपनी कालाखट्टा, कच्ची कैरी, मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र गावागावांमध्ये दिसत आहे. उन्हाचा चटका जाणवू लागल्याने रसवंतीगृहे दिसू लागली आहेत.
बर्फाची तपासणी आवश्यक
शीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ आरोग्यास कितपत योग्य आहे, याची तपासणी करणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे नागरिक आजारी पडत असताना बर्फाचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे बर्फाची तपासणी केलेली असावी. तसेच आजार उद्भवू नये म्हणून बर्फाशिवाय रस प्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
फ्रिजमधील तसेच थंड पाणी, बर्फ टाळा
उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्याचा परिणाम शरीरावर होतो. यासाठी नारळ पाणी, उसाचा रस, विविध फळांचे ज्यूस, लिंबू पाणी यांचे जास्त सेवन करावे. यात जीवनसत्त्व तसेच मूलद्रव्ये असतात. लहान मुले व वृद्ध नागरिकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आग्रह करावा. त्यामुळे पाण्याचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होईल. फ्रिजमधील थंड पाण्याचा कशाला त्रास होऊ शकतो.