सोरतापवाडी -सोरतापवाडी येथील शेतकरी व कॉंग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खंडेराव चौधरी यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी सर्वसामान्य पोल्ट्रीधारक शेतकरी बनत आहे. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी शासनाकडे पोल्ट्रीच्या शेडमध्ये अफू व गांजाची शेती करण्याची परवानगी मागितली आहे. या परवानगीने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, शासनाच्या निर्णयाकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौधरी यांनी पत्राद्वारे थेट मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद व हवेली तहसीलदार यांच्याकडे मागणी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या अवाजवी कर आकारणीमुळे हतबल झाले असून, 2007 पासून कॉन्ट्रॅक्ट बॉयलर फार्मिंग करत असून शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे बळी जात असलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत यांचा समावेश आहे. कुक्कुट पालन आणि गाई पालन हा व्यवसाय शेतीपुरक मानला गेला आहे.
ज्याप्रमाणे शेती निसर्गावर अवलंबून असते, शेतकऱ्याच्या कोणत्याही पिकाला शासन हमीभाव देत नाही. त्याचप्रमाणे पोल्ट्री व्यवसाय देखील हा या लहरी निसर्गावरती आणि करार (कॉन्ट्रॅक्ट) करणाऱ्या कंपन्यावरती अवलंबून आहे. शासनाने करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कंपन्यावरती नियंत्रण ठेवलेले दिसून येत नाही. म्हणून ते सर्रास पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे पिळवणूक करत आलेले आहेत.
शिवाय शासनदेखील मालमता कर म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडून भरमसाठ करपट्टी आकारात आहेत. 1960/1990 या सारख्या शासन निर्णयाची अंमलबावणी केली नाही. महाराष्ट्रात शासन काही ठिकाणी 13 पैसे स्क्वेअर फूट आकाराने पोल्ट्रीवर मालमता कर आकारात असते. चौधरी यांना 2007 साली शेड करण्यासाठी 8 लाख रुपये खर्च आला होता. तरी तरडे ग्रामपंचायतीने चौधरी यांच्या शेडचे बाजारमूल्य रेडी रेकनरनुसार एक कोटी धरले आहे.
त्यानुसार चौधरी यांच्याकडून कर भरण्यासाठी ग्रामपंचायत तगादा लावत आहे. पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडला आहे. या व्यवसायाला शासन मदत करत नाही. तरीसुद्धा माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी शेडमध्ये अफू व गांजा हे पीक घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
राज्यात पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांमुळे, या व्यवसायाला योग्य भाव मिळत नसल्याने आधीच शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. त्यातच ग्रामपंचायतकडून व्हॅल्युएशन रेडीरेकनर वाढविल्यामुळे अव्वाच्या सव्वा कर आकाराला जात आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन यातून तात्काळ मार्ग काढावा. नाहीतर शेतात अफू व गांजा लावण्याची परवानगी द्यावी.
-नंदकुमार चौधरी, शेतकरी सोरतापवाडी