श्रीकांत कात्रे
घरकाम करणारी महिला स्वतःबरोबरच इतर महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करते आणि स्वतःचे वेगळे अस्तित्त्व निर्माण करते, ही गोष्ट सोपी नाही. पण ती अवघडही नाही, हे अपर्णा जंगम यांनी सिद्ध करून दाखवले आहे. चवदार पदार्थ तयार करून लोकांना खाऊ घालण्याच्या आवडीचे रुपांतर व्यवसायात करून त्यांनी इतर महिलांना आत्मनिर्भर करण्यात यश मिळविले. त्यांचा हा कष्टमय प्रवास त्यांना एक वेगळाच आनंद देत राहिला. म्हणूनच आता नोकरदार महिलांना जेवण आणि लहान मुलांसाठी पौष्टिक पदार्थ देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे…
खाण्याचे पदार्थ तयार करण्याची आवड अपर्णा जंगम यांना होती. परंतु, मुले लहान असताना ही आवड घरापुरती मर्यादितच राहिली. आता मुले मोठी झाल्याने या आवडीचे रुपांतर त्यांनी व्यवसायात केले. पण ते करताना परिसरातील गरजू महिलांना रोजगार देण्याचा हेतू त्यामागे असल्याचे त्या सांगतात. खरं तरं हा विचारच खूप मोठा होता. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याचे आव्हानच त्यांच्यासमोर होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी गणशोत्सवातच या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. व्यवसाय वाढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला करोनाच्या संकटामुळे खीळ बसली. पण त्या नाउमेद झाल्या नाहीत. खंबीरपणे पुन्हा त्या कामाला लागल्या. आणि आता त्यांचा व्यवसाय केवळ हंगामापुरता मर्यादित न राहता तो बारमाही झाला आहे. त्यांचे माहेर सातारा जिल्ह्यातील मलकापूर (कराड) आणि सासर विटा खानापूर. पश्चिम महाराष्ट्रातून कामोठे (नवी मुंबई) येथे जाऊन त्यांनी ही स्थिरता मिळवली. त्यांचे पती पोर्ट ट्रस्टमध्ये अभियंते आहेत. लहान मुले आणि घरकाम यातच त्या गुंतून पडल्या. आता मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे तर मुलगी बी. एस्सी. होऊन दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास करत आहे.
त्यामुळे त्यांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांना सवड मिळाली. त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा मिळवला. दिवाळी फराळातील सर्व पदार्थ त्या करतातच, पण टेस्टी दर्जेदार चकली आणि चिवडा ही त्यांची खासियत आहे. पुन्हा गणेशोत्सवातच त्यांचा व्यवसाय सुरू झाला. पाहता पाहता आर्डर्सची संख्या वाढू लागली. त्यात माणदेशी फाउंडेशनशी संपर्क आल्यावर मार्केटिंगला दिशा मिळाली. पॅकेजिंग, स्टिकर्स, बॅंनर्स याबरोबरच डीजिटल मार्केटिंगचे तंत्र माणदेशीकडून शिकायला मिळाले. प्रदर्शन आणि महोत्सवात स्टॉलद्वारे विक्री करण्याची संधी मिळाली. सध्या सहा महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिलांची मदत होत असली तरी उत्पादनाचा दर्जा टिकविण्यासाठी आणि पदार्थांची चव कायम राखण्यासाठी त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. त्यांचे कष्ट मोठे आहेत. डाळ वाळवण्यापासून दळणे, भाजणे इथपर्यंतची कामे व्यवस्थित व्हावी लागतात. बुंदी पाडताना विशिष्ट पद्धत वापरावी लागते.
पदार्थ बिघडून चालत नाही. त्यामुळे या साऱ्या गोष्टी त्यांना स्वतःलाच कराव्या लागतात. कारण पदार्थांची चव आणि दर्जा राखण्यास मदत होते. विविध ठिकाणच्या प्रदर्शनातून किंवा महोत्सवातून लोकांकडून समोरून येणारा प्रतिसाद उत्साह वाढवतो. त्याशिवाय अशा उपक्रमांतून लहानमोठ्या ऑर्डर्सही मिळतात, असे त्यांनी सांगितले. डेलिश टेस्टी फूडस् या नावाने सुरू असणाऱ्या त्यांच्या या घरगुती व्यवसायातून चिवडा, चकलीप्रमाणेच बेसन, रवा, बुंदी, मेथी, ड्राय फ्रूट, पौष्टिक लाडू, पातळ, भाजका, डाएट पोहा चिवडा, गोड, तिखट शंकरपाळी अशी विविध उतत्पादने घेण्यात येतात. त्याशिवाय यापुढील काळात नोकरदार महिलांना वेळ मिळत नसल्याने त्यांची गरज ओळखून त्यांच्यासाठी घरगुती जेवण पुरविणे तसेच लहान मुलांसाठी ड्राय फ्रूटस्चा उपयोग करून पौष्टिक आरोग्यदायी पदार्थ बनविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. कारण बाजारात तयार मिळणाऱ्या विविध पदार्थांपेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहून प्रतिकारशक्ती वाढू शकते, अशा पद्धतीने खारीक खोबरे पावडर स्वरूपात दुधातून मुलांना देता येईल अशा स्वरूपाचे उत्पादन त्यांना करायचे आहे. सध्या त्यांचे सर्व काम हातानेच चालते. कोणत्याही मशिनरीचा वापर अजून केला जात नाही. मशिनरी त्यांना घ्यायची आहे.
परंतु, प्रश्न भांडवलाचा आहे. मुलगा किंवा कुटुंबातून त्यासाठी मदतीचा हात पुढे येतो. परंतु, तो त्या नम्रपणे नाकारतात. मला माझे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करायचे असेल तर सारे स्वबळावरच झाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. पीठ दळण्यासाठी त्यांना साडेतीन हजार रुपये मोजावे लागतात. त्यासाठी त्यांना मशिनरीची गरज आहे. पीठ मळण्याचे मशीन किंवा इतर छोट्या मशीन्स त्यांना हव्या आहेत. स्वतःच्या हिमतीवर त्यांना हे सारे उभे करायचे आहे. त्यासाठी त्या जिद्दीने वाटचाल करीत आहेत. घरकाम करणारी गृहिणी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कष्टाची तयारी ठेवून इतर महिलांच्या आर्थिक प्रगतीचा विचार करते, ही गोष्ट खूपच महत्त्वाची ठरते. म्हणूनच अपर्णा जंगम यांची कामगिरी इतरांसाठी आदर्शवत अशीच आहे.