जांबूत -पिंपरखेड (ता. शिरूर) दत्तवाडी येथील शेतकरी अशोक टाकळकर यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.25) पहाटे सहाच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. येथील परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, दत्तवाडी, बोंबेमळा, आंबेवाडी आदी भागात वनविभागातर्फे पिंजरे लावण्यात आले आहेत.
मागील आठवड्यात अरुण शिंदे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळी वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले होते. आतापर्यंत महिनाभरात पिंपरखेड येथे चार बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. पहाटेच्या सुमारास पिंजऱ्याची झडप वाजल्याने अरुण शिंदे यांनी पिंजरा पाहिल्यानंतर बिबट्या जेरबंद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यावेळी त्यांनी वनविभागाचे कर्मचारी महेंद्र दाते यांना घटनेची माहिती दिली असता, दाते यांनी घटनास्थळी धाव घेत बंदिस्त बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी रवाना केले. याप्रसंगी बंदिस्त झालेला बिबट हा नर संवर्गातील असून, तीन ते साडेतीन वर्षे वयोमान असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
अनेक शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या शेतात काम करताना बिबट्यांचे दर्शन होत असून, या भागात बिबट्यांची संख्या मोठी असण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवून ड्रोनद्वारे पाहणी करून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.