आपल्या काही समजुती या परिकथेइतक्याच घट्ट आणि मनोरंजक असतात. त्यांना कधी आध्यात्माचा आधार असतो तर कधी फॅंटसीचं रूप असतं. माझ्या मनात एक समजूत घर करून राहिली आहे. किंचित वेडगळ परंतु तार्किकदेखील. पुनर्जन्म ही अशीच एक संकल्पना. माणूस जन्माला येतो. एका विशिष्ठ स्वभावानं जगत राहतो, ज्यातून त्याचं व्यक्तिमत्त्व तयार होतं. नंतर त्याचा मृत्यू होतो. त्याचा मुक्त आत्मा पुनर्जन्मासाठी वाट पहात राहतो.
अशी वाट पहाणं तो का करतो तर त्याच्या पहिल्या जन्मासारखं होण्यासाठी त्याला योग्य आईबाप हवे असतात. सामान्य जीवन जगलेल्या आत्म्याला सहजपणे असे आईबाप मिळून जातात. विलक्षण सुष्ट वैचारिक जगलेल्याना तसंच जगण्यासाठी तितकेच तोलामोलाचे आईबाप मिळण्यासाठी बरीच वाट पाहावी लागते. त्याच चालीवर अतिशय दुष्ट प्रवृत्तीनं आयुष्य घालवलेल्या व्यक्तीलासुद्धा तसे आईबाप मिळणं दुर्लभच होतं.
माझ्या बघण्यात पुण्यातील दोन भाऊ. त्यांच्या प्रवृत्ती भिन्न पण आईबाप एकच. थोरला भाऊ राम. फारसं शिकला नाही. शिक्षणाच्या अभावानं छान नोकरी त्याला मिळाली नाही. उदरनिर्वाहासाठी त्यांनी छोटे मोठे उद्योग केले. बेकरी व्यवसाय हा त्यातलाच एक धंदा. भरपूर यश मिळाल्यानं बेकरी व्यवसायात जम बसला. जम बसला म्हटल्यावर त्यांनी उत्तम पैसा मिळवला हे ओघानं आलंच. व्यावसायिक असल्यानं अवतीभोवती लोकांचा गराडा.
दुसरा भाऊ केशव. पदवीधर झाला. सरकारी नोकरीत लागला. खात्याच्या परीक्षा देत उच्च्पदस्थ झाला. पगार बरा होता. नोकरीतल्या अधिकारामुळं स्वभाव हेकट झाला. परिणामी त्याच्या भोवती अगदीच मोजकी माणसं. दोघेही भाऊ राम आणि केशव म्हातारे झाले. रामभाऊंनी आपला व्यवसाय मुलाकडं सोपवला आणि निवांत झाले. केशवरावांनी निवृत्ती घेताच निवांत न होता समाजासाठी काही करावं अशी जागृती स्वतःमध्ये करून घेतली.
रामभाऊ एकदम निवांत झाल्यामुळं आपल्या प्रकृतीकडं जास्तच लक्ष देत होते. त्यामुळं सतत आजारी आहोत या भावनेनी व्याकुळ झालेले असायचे. त्यांच्या अवयवागणिक निरनिराळे डॉक्टर. अलोपॅथी,आयुर्वेद ,होमिओपॅथी होतीच परंतु अजुनी युनानीचा अंतर्भाव झालेला नव्हता. आजच्या सकाळी त्यांना सर्दी झाली. डॉक्टरांना फोन केला आणि विचारलं, डॉकटर सर्दी झालीय दाखवायला येऊ का?
डॉक्टरांनी संभाव्य धोका जाणून सांगितलं, रामभाऊ सर्दीच झालीय ना, होईल बरी.
आपोआप बरी व्हायला सात दिवस लागतील. माझ्याकडून औषध नेलं तर आठवड्यात बरी होईल. आपल्याच विनोदावर डॉक्टर एकटेच हसले. रामभाऊ आजारी असल्यानं हसू शकले नाहीत. शेवटी असं ठरलं की रामभाऊंनी आपला नोकर डॉक्टरांकडं पाठवायचा. ते औषधं लिहून देतील. नोकरांनी ती दुकानातून आणायची ..घ्यायची. सर्दीतून बरं व्हायचं आणि दुसऱ्या आजाराच्या तयारीत रहायचं. नोकराला दोनशे रुपये देऊन पाठवलं. अर्ध्या तासात नोकर परत आला. रामभाऊंना त्यानी गोळ्यांचं रॅपर आणि पातळ औषधाची बाटली दिली. त्यावर रामभाऊ नोकराला म्हणाले, उरलेले सुटे पैसे टेबलाच्या खणात ठेव.
नोकरांनी दोनशे रुपये खणात ठेवलेले त्यांनी बघितले. चमकून म्हणाले, हे काय, मेडिकलवाल्याला पैसे न देताच आलास? असाही जाब विचारला जाऊ शकतो हे नोकर जाणून होता. त्यांनी खुलासा केला, आजोबा, डॉक्टरांनी त्यांच्या जवळची कंपनीनं दिलेल्या फ्री सॅंपल मधून ही औषधं दिली आहेत पण त्याचे पैसे लावले नाहीत. त्यामुळं तुम्ही दिलेले सगळे पैसे परत आणले आणि खणात ठेवले. बरं जाऊ मी आता? थांब… थांब… या दुसऱ्या दोन डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठ्या घेऊन परत त्या डॉक्टरांकडं जा. बघ ही औषधं पण त्यांच्याकडं फ्री सॅंपल म्हणून उपलब्ध आहेत का? डॉक्टरांपेक्षाही नोकरच जास्त अवाक झाला.
केशवराव यांची वयोमानानुसार झोप कमी झाली होती. यापूर्वी गजर लावून ते सूर्योदय अनुभवायला उठत असत, आता त्यांना सूर्योदयाची प्रतीक्षा करावी लागते. आपली प्रकृती आपणच जपायची असते, तो भार डॉक्टर किंवा औषधं यांच्यावर टाकायचा नाही हा त्यांचा बाणा. याचाच भाग म्हणून ते सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात मोकळ्या परंतु पालापाचोळ्यानी भरलेल्या रस्त्यानी फिरत असत. फिरताना रस्ता उंच सखल नाही असाच निवडल्यामुळं ते इकडे तिकडे बारकाईनं बघत, नोंदी घेत फिरत असत. त्यांच्या निरीक्षणातून जाणवलेल्या त्रुटी ते संबंधितांना आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना कळवत असत, त्याचा पाठपुरावा करत असत. त्यांच्या या स्वभावाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा होत असल्यानं लोक त्यांच्या माघारी टिंगल करत आणि नावाजतदेखील असत. आज त्यांच्याच सोसायटीत एक त्रुटी त्यांच्या लक्षात आली.
प्रत्येक दुमजली इमारतीच्या जिन्याखालच्या जागेत अडगळीच्या सामानाचे ढीग लागले आहेत. यामध्ये वापरात नसलेल्या गंज पकडलेल्या सायकली आहेत. त्यांनी संख्या मोजली चार. ते ताबडतोब सेक्रेटरींना ओढून घेऊन आले. याबाबत आपण फारसं काही करू शकणार नाही हे त्यांनी प्रांजळपणे सांगितलं. पुढच्या आठ दिवसात आणखी दहाबारा सोसायट्यांच्या सेक्रेटरींचे दरवाजे ठोठावले. पण त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरींप्रमाणं या सर्वांनी त्यांची री ओढली. स्वतःला त्रास करून घेत केशवराव प्रत्येक सोसायटीमधून बाहेर पडत आणि सायकलींच्या संख्येची बेरीज मारत. बारा सायकलींचे मालक त्यांनी धुंडाळून काढले. त्यांना खडे बोल सुनावले. काहीसं रागावून या लोकांनी स्वतः काही करणार नाही पण केशवरावांनी या सायकली भंगारमध्ये दिल्या आणि त्याचे पैसेदेखील आम्हाला दिले नाहीत तरी चालेल असं एकमुखानी सांगितलं…नव्हे केशवरावांनी वदवून घेतलं.
एका सकाळी टेंपोमध्ये बारा सायकली चढल्या आणि सायकल दुरुस्ती करणाऱ्या दवाखान्यात पोचल्या. अतिशय खराब पाच सायकली वगळून उरलेल्या सात सायकली वापरता येतील इतपत चकाचक झाल्या. दुरुस्तीचे पैसे केशवरावांनी स्वतः दिले आणि त्यांच्या परसदारी मुद्दाम तयार केलेल्या लोखंडी स्टॅण्डवर विराजमान झाल्या. काही दिवसात सात सायकली सात गरजू दूध, पेपर टाकणाऱ्या मुलांच्या हाती विनामोबदला सोपवण्यात आल्या. अट एकच…त्या मुलांनी आपली सायकल खरेदी केली की त्यांच्याच परिचयाच्या गरजू मुलास पहिली सायकल हस्तांतरित करायची.
दोन वर्षांत केशवरावांना कधीही पश्चाताप करावा लागला नाही. उलट आजूबाजूच्या आणखी सोसायट्यांमधल्या सायकली नव्यानं भरती झाल्या. रामभाऊ आणि केशवराव एकाच आईबापांची अपत्य जेव्हा या जगाचा निरोप घेतील तेव्हा त्यांना पुनर्जन्मासाठी नव्या आईबापांची किती प्रतीक्षा करावी लागेल?
दीपक पारखी