मनो मधुकरो मेघो मद्यपो मत्कुणो मरुत् ।
मा मदो मर्कटो मत्योमा मकारा दश चंचलाः ।।
या संस्कृत श्लोकात मन, भुंगा, ढग, दारुडा, ढेकूण, वारा, लक्ष्मी, हत्ती, वानर आणि मासा (सर्व “म’ या अक्षरानं सुरुवात होणारे शब्द) हे सगळे अतिशय चंचल आहेत असं म्हटलं आहे. अर्थात् याखेरीजही अनेक चंचल गोष्टी आहेतच. एका सुप्रसिद्ध सिनेगीतातली किरणों का तेज है चेहरे पे हिरनों की है तुझ में चंचलता… ही ओळ आठवते का? यात नायिका हरिणाप्रमाणे चंचल आहे असं म्हटलं आहे.
लहान मुलाला खेळण्यांच्या किंवा खाऊच्या दुकानात घेऊन जा आणि गंमत पाहा. त्या मुलाला हे खेळणं घेऊ की ते घेऊ किंवा हा खाऊ घ्यायचा की तो घ्यायचा असं होऊन जाईल. ही त्याची चंचलता.
अर्थात् लहान मुलंच कशाला मोठ्या माणसांमध्ये पण अशी चंचलता दिसून येते. लग्नासाठी वधू पाहत असलेल्या तरुणाला जर दोन-तीन चांगल्या मुली सांगून आल्या असतील तर त्याचीही द्विधा मनस्थिती होऊन चंचलता स्पष्ट होते. स्त्रिया जेव्हा साडी किंवा ड्रेस खरेदी करायला जातात तेव्हा त्यांच्या चंचलतेमुळे सुरुवातीला एक-दोन वस्रखरेदीसाठी दुकानात गेलेली स्त्री चांगले चार-पाच ड्रेस/साड्या खरेदी करून येते. एका साडीचा काठ, दुसरीचा पोत, तिसरीचा रंग असं एकाच साडीत न मिळाल्यामुळे ती त्या तिन्ही-चारी साड्या खरेदी करते. हा मनाच्या चंचलतेचाच परिपाक आहे.
मन अतिशय चंचल असणं हे धोकादायक होऊ शकतं. महत्त्वाचे निर्णय घेताना जर मनाची चलबिचल झाली तर ती वेळ प्रसंगी संकटाला निमंत्रण देऊ शकते. अचानक समोरून एक वाहन आलं तर डावीकडे जायचं की उजवीकडे असा संभ्रम निर्माण होतो. नेमका तसाच संभ्रम समोरच्या व्यक्तीच्या मनात आला आणि दोघेही एकाच दिशेला वळले तर घात झालाच म्हणून समजा. चंचल मनोवृत्तीच्या व्यक्तीनं निर्णय घेण्यात दिरंगाई केली तर समस्या अधिक बिकट होऊन बसते. म्हणून चंचल वृत्तीच्या माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे की निर्णय योग्य वेळी घेणं हे न घेण्यापेक्षा फार महत्त्वाचं असतं.
अगदी चुकीचा निर्णय पण योग्य वेळी घेतला तरी चालेल कारण त्याची किंवा तिची निर्णय घेणाऱ्यात गणना होईल की जे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक राजकारणी निर्णय न घेण्यात धन्यता मानतात कारण समस्या भिजत ठेवणं त्यांच्या राजकीय जीवनासाठी हिताचं ठरतं. ते त्या विलंबाचं खापर इतरांवर फोडतात. पण हे केव्हा ना केव्हा तरी त्यांच्यावर शेकू शकतं हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
नोकरी, शिक्षण या बाबतीतही गरजूंच्या मनामध्ये बऱ्याचदा चंचल वृत्ती दिसून येते. तुम्हाला हव्या त्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळू शकतील असं नाही. कधी नोकरीचं ठिकाण आडगावाला असतं तर कधी कंपनी/संस्था खात्रीची असेल अशी शाश्वती नसते. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून परंतु निर्णय चटकन् घेणं उचित ठरतं अन्यथा चांगली संधी हातातून निघून जाण्याची शक्यता असते. यासाठी तडजोड (कॉंप्रोमाइज) ही निर्णायक ठरते.
माझ्याकडे एकदा एक वडील-मुलगा अशी जोडगोळी आली होती. वडिलांची तक्रार अशी होती की मुलाला चांगले मार्क्स पडले आहेत तरी पण तो इंजिनीयरिंगला जाऊ इच्छित नाही. त्याला कलेमध्ये खूप इंटरेस्ट आहे. वडिलांनी आजूबाजूच्या/ओळखीतल्या मुलांचं आयटीमधलं करियर पाहिलं होतं. मुलगा मात्र नक्की काय ते सांगत नव्हता. त्याला बहुधा वडिलांची भीती वाटत असावी. मी त्या मुलाशी एकट्याशी बोललो आणि लक्षात आलं की त्याच्यासाठी वास्तुरचना हे क्षेत्र योग्य राहील. मी वडिलांचं मन वळवलं. आज तो मुलगा देशातील एक अग्रगण्य वास्तुविशारदांपैकी एक आहे. चंचल मनाला मार्गावर आणण्यासाठी संवाद आवश्यक आहे. आवडीचं, अपेक्षांचं ओझं आपण विनाकारण मनावर लादत असतो. “कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है’ या न्यायानं अतिरिक्त ओझं टाकून दिलं की मार्ग सुकर होतो.
– श्रीनिवास शारंगपाणी