वेल्हे -राजगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याचे कारण देत पुरातत्त्व विभागाने राजगड किल्ल्यावर मुक्कामास पर्यटकांना बंदी केलेली असताना गुंजवणे ग्रामपंचायत मात्र, राजगड पायथा परिसरातील पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने सरसावली आहे.
सरपंच गुलाब रसाळ यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच रूपाली पवार, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ रसाळ, सुनंदा शिळीमकर, शिवाजी भोसले, बाळू पावर यांनी स्वच्छतेच्या दृष्टीने स्वतःच हातात झाडू घेऊन गावची स्वच्छता करण्याचा निर्धार केला आहे. या सर्वांनी आठवड्यातील दोन दिवस स्वच्छतेसाठी ही संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
“माझे गाव माझी जबाबदारी’ या भावनेतून गावच्या विकासाबरोबरच ग्रामस्वच्छता ही गरजेची आहे, ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण काम करीत आहोत. कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल, या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे सरपंच गुलाब रसाळ यांनी सांगितले.
ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींचे गावाप्रती असलेले योगदान नक्कीच सर्वाना दिशा देणारे आहे. अशा उपक्रमांचे अनुकरण अन्य गावांनी व ग्रामपंचायतीनी करावे, असे वेल्हे पंचायत समितीचे माजी उपसभापती अनंता दारवटकर यांनी केले.