सातारा – जिल्ह्यातील 42 पैकी 34 ब्लॅक स्पॉट कमी करण्यात उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाला यश आले असले तरी वाढती अपघातांची संख्या चिंताजनक आहे. जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत जिल्ह्यात 944 अपघातांमध्ये 483 जणांचा मृत्यू झाला असून 355 जणांना गंभीर इजा झाली आहे.
अपघात रोखण्यासाठी आरटीओ विभागाकडून स्पीडगन केसेस, तालुक्यानुसार रस्ता सुरक्षा अंमलबजावणी व प्रबोधन, एकाग्र अपघातप्रवण क्षेत्रात विशेष अंमलबजावणी, रस्ता सुरक्षेबाबत सामाजिक जनजागृती आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकार पालन करणे गरजेचे असून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय आढाव्यादरम्यान जिल्ह्यातील अपघात व त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक झाली.
त्यानुसार आरटीओ विभागाकडून आणखी उपाययोजना करण्यात येत आहेत. प्राणांतिक अपघात 51 टक्के तर त्याव्यतिरिक्त अपघात 49 टक्के आढळून येत आहेत. शहरी भागात 25.6 तर ग्रामीण भागात 74.4 टक्के अपघात घडत आहेत. जवळपास 50 टक्के अपघातांमध्ये दुचाकी वाहनाचा समावेश असून 26 टक्के अपघात चारचाकी, 24 टक्के अपघातात अवजड वाहने व इतर वाहनांचा समावेश आहे. दिवसा 55 टक्के, रात्री 31 टक्के, पहाटे 14 टक्के अपघात झाल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक अपघात राज्य मार्गावर होत असून इतर रस्ते व तुलनेने कमी अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. 95 अपघातांमध्ये पादचाऱ्यांचा समावेश असून 19 अपघातांमध्ये सायकलस्वारांचा समावेश आहे.
एकूण अपघाताच्या जवळपास 20 टक्के अपघातामध्ये पादचारी व सायकलस्वारांचा समावेश आहे. जानेवारी 2022 मध्ये 81 अपघातांमध्ये 37 जणांचा मृत्यू झाला होता तर जानेवारी 2023 मध्ये 90 अपघातांमध्ये 47 जणांचा मृत्यू झाला. रस्त्यांचा विचार करता सर्वाधिक अपघात राष्ट्रीय महामार्ग त्यानंतर इतर रस्ते व सर्वात कमी अपघात राज्य महामार्गावर झाल्याचे दिसून येत आहे. 42 टक्के अपघातात दुचाकी, 23 टक्के अपघातात चारचाकी तर 35 टक्के अपघातात अवजड व इतर वाहनांचा समावेश आहे. अपघात व मृत्यूचे वाढते प्रमाण निश्चितच चिंताजनक असून अपघात रोखण्यासाठी आणखी कडक उपाययोजना करण्यात येत असल्याचे विनोद चव्हाण यांनी सांगितले.
वाढते अपघात रोखण्यासाठी संसदीय रस्ता सुरक्षा समिती व जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या बैठका नियमित होत आहेत. वारंवार अपघात होणाऱ्या ब्लॅक स्पॉटनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा व इतर कारवायांबाबत विशेष पथकांची निर्मिती करण्यात येत आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याचे अभियान राबवण्यात येत आहे. तालुकानिहाय संपूर्ण रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्याबाबत उपाययोजनांसाठी संबंधित विभागाला कळवण्यात आले आहे. वेळे, उडतारे, लिंब खिंड, शेंद्रे- वळसे येथे स्पिडगन केसेस, तालुक्यानुसार रस्ता सुरक्षा अंमलबजावणी व प्रबोधन, शेंद्रे, खेड, तांबवे फाटा, कुमठे फाटा येथे ओव्हरस्पीड, हेल्मेट, सीटबेल्ट, रॅश ड्रायव्हिंग आदीबाबत विशेष अंबलबजावणी करण्यात येत असल्याचे विनोद चव्हाण यांनी सांगितले. यावेळी कराड येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे उपस्थित होते.
8 कोटी 16 लाख 44 हजार दंड वसूल
वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सातारा कार्यालयामार्फत 6 कोटी 44 लाख 75 हजार तर कराड कार्यालयाकडून 1 कोटी 71 लाख 69 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सातारा कार्यालयाने 17 हजार 641 वाहनांवर कारवाई करुन 3 कोटी 27 लाख 34 हजार तडजोड शुल्क तर 3 कोटी 17 लाख 41 हजार करवसुली केली आहे. कराड कार्यालयाने 4 हजार 973 वाहनांवर कारवाई करुन 1 कोटी 10 लाख 86 हजार रुपये तडजोड शुल्क व 31 लाख 8 हजार रुपये करवसुली केली आहे. सातारा कार्यालयाने स्पीडगनच्या 8 हजार 410 तर कराड कार्यालयाने 2 हजार 510 केसेस केल्या असल्याचे विनोद चव्हाण यांनी सांगितले.