पेठ – स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले शिवनेरी गड ते किल्ले पुरंदर गड या पालखी सोहळ्याचे पेठ (ता. आंबेगाव) येथील वाकेश्वर मंदिराजवळ उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यासाठी आकर्षक शिवशाही रथ बनवला आहे. सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आण छत्रपती संभाजी महाराज या पिता-पुत्राची भेट शिवाजी महाराजांच्या अंतिम समय झाली नव्हती. त्यामुळे प्रतिकात्मकरित्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भेट घडवून आणली जाते. ही संकल्पना या सोहळ्याचे प्रमुख बाजीराव महाराज बांगर यांची आहे.
शिवनेरी गडावर (ता. जुन्नर) येथे पहाटे सहा वाजता संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज हभप माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विधिवत अभिषेक करून पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
याप्रसंगी हभप नामदेव महाराज वाळके, पांडुरंग महाराज घुले, परशुराम महाराज गावडे, मिलिंद एकबोटे आदी मान्यवरांबरोबर स्वराज्य संघाचे राज्य स्तरावरील सर्व पदाधिकारी, शिवसेना उद्धव गट तालुकाप्रमुख दिलीप पवळे, अशोक बाजारे, अशोक राक्षे, सोपान नवले, माऊली एरंडे, मल्हारी ढमाले, ग्रामपंचायत सदस्य अर्चना बुट्टे, प्राध्यापक अंकुश कातळे, संदीप तोत्रे, नरेंद्र पवळे, तुषार पातकर उपस्थित होते. सूत्रसंचालन अमित महाराज कातळे यांनी केले.