बेल्हे : बांगरवाडी गावाच्या सीमेवरून वाहणारा पिंपळगाव जोगा कालवा जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरला असून शेतकऱ्यांचे बागायतदार होण्याचे स्वप्न साकार होताना दिसून येत आहे; परंतु हे होत असताना या महिन्यात विहिरींचे पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी उचलपाण्यासाठी कालव्यावर ठेवल्या खऱ्या पण त्या मोटारीवर चोरट्यांची दृष्टी पडल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
बांगरवाडी रविवारी (दि. 29) रात्री 7-5 अश्वशक्तीच्या व अंदाजे दोन लाख रुपयांच्या 5 ते 6 मोटारी, केबल व स्टार्टरसह चोरट्यांनी चोरुन नेल्याची माहिती बेल्हे शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र गफले यांनी दिली. सोमवारी (दि.30) सकाळी दिवसा वीजपुरवठा असल्याने गफले आपली मोटार सुरू करण्यासाठी कालव्यावर गेले असता त्यांच्या मोटारीचे पाइप कापून मोटार नेल्याचे दिसून आले. अधिक तपास केला असता बांगरवाडीचे माजी सरपंच पांडूरंग शिरतर, गोविंद बिचारे,नामदेव बांगर,संजय बांगर यांच्याही मोटारींची चोरी झाल्याचे दिसून आले.
यापूर्वीही असे प्रकार झाले असून त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. संजय बांगर यांची मोटार दुसऱ्यांदा चोरीला गेल्याने 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असून परत नवीन मोटार आणण्याचा खर्च परवडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कालव्यावर याअगोदरही जवळपास 9 ते 10 शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीस गेल्याचे समजते.
शेतकऱ्यांनी जगावे की मरावे?
अगोदरच शेतमालाला बाजारभाव नाही, बेल्हे येथील एक सोयाबीन व्यापारी शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडवून पळून गेला असून त्यात आता मोटारींची चोरी झाली असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावे का मरावे असा प्रश्न माजी सरपंच पांडुरंग शिरतर यांनी उपस्थितीत केला आहे.