बारामती (प्रतिनिधी) – बारामतीच्या विकास कामात सर्वांचे योगदान आहे. विकास कामासाठी येणारा निधी एकत्रित येत होता. काहींनी वाढप्याची भूमिका पार पडली. बारामतीचा विकास मीच केल्याचे चित्र निर्माण केले आहे. असा टोला राजेंद्र पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला आहे. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्र पवार बोलत होते.
राजेंद्र पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. पवार कुटुंबात सामाजिक कामे व राजकीय कामे कोणी करायची हे आधीच ठरलं होतं. सामाजिक कामे आम्ही करत राहिलो. राजकीय कामे ते करत राहिले. त्यामुळे ते लोकांच्या समोर राहिले. कोणी कोणाच्या कामात लुडबुड करायची नाही हे देखील ठरलं होतं. त्यामुळे आम्ही राजकारणात नव्हतो.
शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, यांचा निधी एकत्रित होता. त्यातूनही विकास कामे होत होती. केवळ वाढप्याचे काम केल्याने ते पुढे राहिले आसा घनघात राजेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर केला. माझी भावंड माझ्या विरोधात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत असे अजित पवार यांनी एका सभेत म्हटले होते.
यावर राजेंद्र पवार यांना विचारले असता ते म्हणाले, सुरुवातीच्या काळात सायकलवर प्रचार केला आहे. त्याकाळात सर्व घरे पालथी घातले आहेत. त्यानंतरच्या काळात बारामती मध्ये सुरुवातीची सभा व सांगता सभा होत होती. त्यावेळी ते तरी कुठे सर्वांच्या घरी जात होते. आत्ता चित्र वेगळे आहे. आता त्यांना गावोगावी फिरावे लागत असल्याची टीका राजेंद्र पवार यांनी केली.
यावेळी शहराध्यक्ष संदीप गुजर, सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, सुभाष ढोले, शहरचे युवकअध्यक्ष सत्यव्रत काळे, महिला अध्यक्ष वनिता बनकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.