बेलसर -पुरंदर तालुक्यातील कोथळेमधील कल्याणी महिला बचत गट यांच्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. कल्याणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सीमा नामदेव भंडलकर (रा. कोथळे) यांच्या स्वस्त धान्य दुकान परवान्याची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिले.
स्वस्त धान्य दुकान परवानाधारक कल्याणी महिला बचत गटातर्फे अध्यक्षा सीमा नामदेव भंडलकर यांच्याकडून तपासणीत कमी आढळलेला गहू 10.34 क्विंटल व कमी आढळून आलेल्या तांदूळ 12.12 क्विंटल धान्याची चालू बाजार भावाप्रमाणे रक्कम शासन जमा करून घ्यावी, असेही आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष तुषार ज्ञानेश्वर काकडे (रा. कोथळे) यांच्या तक्रारी अर्जानंतर पुरवठा विभागाने ही कारवाई केली आहे. तहसीलदार यांच्या पत्रान्वये जिल्हा पुरवठा विभाग, नायब तहसीलदार, पुरंदर व मंडलाधिकारी जेजुरी यांनी कल्याणी महिला बचत गट यांच्या स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली. विविध दोष आढळले आहेत. त्यामुळे कल्याणी बचत गटाचा स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द केला आहे.
शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानाकडून पावती देण्यात येत नव्हती. इतर तक्रारीवरून ही कारवाई केली आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील महाफूड या पोर्टलवर (दि.13) एप्रिल व (दि.26) ऑक्टोबर 2020 रोजी तक्रारीन्वये दुकानदार हे लाभार्थ्यांना पावती देत नसल्याची तक्रार शिधापत्रिका धारकांकडून केली होती. त्यामुळे 2020 पासून दुकानदार हे पावती देत नसल्याबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आले.
याबाबत तहसीलदार यांनी वारंवार सूचना देऊनही दुकानदाराने लाभार्थींना पावती दिलेली नसल्याचे आढळले. यावरून वरिष्ठांचे आदेश व शासनाचे निर्देशांचे पालन करीत नसल्याचे दिसून आले आहे. दुकानदारांनी सक्षम कार्यालयाकडील कारणे दाखवा नोटिसाच्या अनुषंगाने सादर केलेल्या खुलाशांमध्ये नमूद केले आहे की, दुकानांमध्ये सर्व नोंदवह्या अद्ययावत असून योजनानिहाय धान्यसाठा वेगवेगळा आहे.
परंतु महसूल कार्यालयाकडून केलेल्या तपासणीवेळी नोंदवह्या तपासणीकामी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना त्यावेळी प्रत्यक्षात साठा नोंदवही अद्ययावत लिहिलेली नसल्याने प्रत्यक्ष जागेवर योजनानिहाय असलेल्या धान्यसाठ्यात तपासता आले नसल्याचे नमूद केले आहे. प्रशासनाच्या तपासणीत मध्यम व गंभीर स्वरूपाचे दोष व धान्य अपहार दिसल्याने अध्यक्षा सीमा भंडलकर हे सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिले आहेत.
पुरंदर तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांमध्ये गैरप्रकार सुरू आहेत. बहुसंख्य ठिकाणी पावत्या दिल्या जात नाहीत. पुरवठा शाखेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी हेसुद्धा दुकानदारांना पाठीशी घालत आहेत. त्यांचीही चौकशी करण्यात यावी. गोरगरिबांचे धान्य गोरगरिबांनाच मिळावे.
– तुषार काकडे, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.