सातारा -राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांसमोर तुकडे फेकण्याचे काम बजेटमधून केले आहे. नवीन महामंडळे सुरु करणे म्हणजे निवडणुका काळात पैसा कमावण्याच्या छत्र्या असून त्याचा प्रत्यक्ष लोकांना काहीच फरक पडत नाही, अशी टीका उपराकार, पद्मश्री लक्ष्मण माने यांनी राज्याच्या बजेटवर केली.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. माने यांनी म्हटले आहे की, आगामी काळात होवू घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्यांचे हित कोठेही दिसत नाही. निवडणुका जवळ आल्याने लोकांसमोर तुकडे फेकण्याचे काम या बजेट मधून करण्यात आले आहे. आधीचे वसंतराव नाईक महामंडळ नीट चालतं नसताना जातींच्या नावाने आणखी नवीन महामंडळ सुरु केली आहेत. महामंडळ म्हणजे निवडणूक काळात पैसा मिळवण्याच्या छत्र्या असून त्याचा प्रत्यक्ष लोकांना काही उपयोग होतं नाही, अशी टीका श्री. माने यांनी अर्थसंकल्पाबाबत केली.
लक्ष्मण माने म्हणाले, राज्यात सध्या काम करत असलेले सरकार हे लोकांची फसवणूक करुन सत्तेवर आलेले आहे. अर्थमंत्री श्री. फडणवीस यांनी लबाड्या करून, आमदारांना विकत घेऊन हे बेकायदेशीर सरकार बनवले आहे. या बेकायदेशीर सरकारने बनवलेल्या बजेटला आम्ही मानत नाही. राज्यातील 27-28 टक्के जनता उपाशी आहे, एससी, एसटीला बजेट देण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे तरीही फडणवीसांनी जातीजातीत तेढ निर्माण होईल असे बजेट मांडले. लोकांच्या तोंडाला पाने पुसून निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेली ही फसवेगिरी आहे. राज्यातील जनता सूज्ञ असून सरकारच्या फसवेगिरीला कदापिही भुलणार नाही.