डिंभे -आंबेगाव तालुक्यात दरवर्षी हजारो हेक्टर जंगलाचे क्षेत्र वणव्यात नष्ट होते, त्यामुळे वातावरण प्रदूषित होऊन सजीवसृष्टीवर याचा परिणाम होतो. येथील वनसंपदा वणव्यांपासून वाचावी. वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे यांनी येथे माहिती देताना सांगितले.
जागतिक तापमानवाढीसारख्या भस्मासुरास अशा जनजागृतीमुळे वेळीच रोखले जाऊ शकते. शेतात आग पेटवू नका. पेटवलीच तर ती विझविल्याशिवाय कुठेही जाऊ नका. शेतात विडी, सिगारेटची पेटती थोटके न विझविता फेकू नका. जंगलात शेकोटी पेटवू नका. हिरडा गोळा करताना झाडाखालील गवत पेटवू नका. मधमाश्यांचे पोळे जाळू नका.
वणवा लागल्याचे निदर्शनास येताच वन विभागाशी संपर्क करून तो विझविण्यासाठी मदत करा. आग लावणाऱ्या व्यक्तीची माहिती वन विभागास सांगण्यास मदत करा. ट्रेक करताना आपल्याकडून कुठेही वणवा लागू नये म्हणून पर्यटकांमध्ये जनजागृती करा, याबरोबरच ग्रामसभेमध्ये वणव्यांपासूनचे धोके नागरिकांना सांगणे, झाडे लावा, झाडे जगवा आदी सूचना वन विभागाने जारी केल्या आहेत.
वणव्यांमुळे वनसंपत्ती नष्ट
आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात डोंगर, जंगले आहेत. सह्याद्रीच्या या रांगेत असणाऱ्या डोंगरकपारीतही आगी लागण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे येथील वने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यावर उपाय करण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होत असतात. वनस्पती पुनर्निर्मितीला बाधा येते. चारा मिळेनासा होऊन जनावरे त्यासाठी भटकतात. ती अशक्त होऊन दुभती जनावरे भाकड होतात.
एक वर्ष कारावासासह पाच हजारांचा दंड
वणवा लावल्यास भारतीय वन अधिनियम 1972 नुसार एक वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा व कोर्ट निर्णय देईल त्याप्रमाणे जंगलाची नुकसानभरपाई भरावी लागणार आहे.
प्रतिबंधक उपाय
शासकीय व खासगी जंगलात सहा व बारा मीटरच्या जाळरेषा काढणे. मोठमोठ्या जंगलात आग निरीक्षण मनोरा उभारणे. रस्त्याच्या दुतर्फा सहा मीटरची जाळरेषा काढणे, जाळरेषेवर पडलेला पालापाचोळा वारंवार झाडणे. आगीचा धूर दिसताच याबाबत जवळच्या वनाधिकाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांना याची माहिती देणे.
भूगर्भातील पाण्याची पातळी घटते
वारंवार लागणाऱ्या आगींमुळे उघड्या पडलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी थेट वेगाने पडते. जमिनीचा सुपीक मातीचा थर पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो. जमिनीची धूप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता नष्ट होते. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. विहिरी, तळी वेळेपूर्वीच आटू लागतात. कीडभक्षी, पक्ष्यांची घरटी, अंडी, पिले जळून खाक होतात.