बालन यांच्यावरील कारवाई रद्द करण्याची मागणी
पुणे – दहीहांडीच्या कालावधीत शहरात लावण्यात आलेल्या जाहिरात प्रकरणी उद्योगपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांना महापालिकेने बजाविलेल्या नोटीस प्रकरणी शहरातील गणेश मंडळांनी आक्रमक भूमिका घेत, तातडीने ही कारवाई रद्द करावी, अशी मागणी केली. या मागणीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करत मागण्यांचे निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना देण्यात आले.
दरम्यान, आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त डॉ. कुणाल खेमणार रजेवर असल्याने या प्रकरणी मंडळांची बाजू ऐकून घेण्यासाठी येत्या सोमवारी (दि.9 ऑक्टोबर) रोजी महापालिकेत बैठक बोलविण्यात आली आहे. आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दहीहंडीच्या दुसऱ्या दिवसापासून गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापर्यंत शहरात अडीच हजार जाहिरात बॅनर लावल्याप्रकरणी बालन यांना तीन कोटी 20 लाख रुपये दंडाची नोटीस पाठवली.
यावरून दहीहंडी व गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गणेश मंडळांचे कार्यकर्ते नितीन पंडित, ऋषिकेश बालगुडे,शिरीष मोहिते, कुमार रेणूसे, संदीप काळे, भाऊ करपे, मयूर उत्तेकर, पुष्कर तुळजापूरकर, राजेंद्र काकडे, पृथ्वीराज निंबाळकर, प्रसाद पटवर्धन, भगवान बलकवडे, विनोद सातव, विनायक कदम, शाम मारणे, दत्ता सागरे यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले.
दंड भरण्यास स्थगिती
दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त खेमणार यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता महापालिकेने बालन यांना दंडाची नोटीस पाठवली नाही, असे स्पष्ट केले. राज्य सरकारने गणेश मंडळांना उत्सव काळात जाहिरात शुल्क माफ केले आहे.
दहीहंडी आणि गणेश उत्सव दरम्यानच्या काळात लावण्यात आलेल्या जाहिरातींचे शुल्क आकारले आहे. तो दंड नसून जाहिरात शुल्क आहे. येत्या सोमवारी यासंदर्भात बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत ती रक्कम भरण्यास स्थगिती देत आहोत, असे स्पष्ट केले.
बालन यांची बदनामी करण्याचा प्रयत्न
कोरोनानंतर मंडळांना वर्गणी मिळण्यात अडचणी येत असताना बालन यांनी मोठा आर्थिक हातभार लावला. गणेश उत्सव साजरा करण्यास मंडळांना बळ मिळाले. शासनानेच मंडळांसाठीचे काढलेले जाहिरात शुल्क माफ करण्याच्या आदेशाचे उल्लंघन महापालिका करत आहे. जाहिरात शुल्क आकारले असेल तर माध्यमांपर्यंत ती नोटीस पाठविण्यामागील अधिकाऱ्यांचा हेतू संशयास्पद आहे. जाणीवपूर्वक बालन यांची बदनामी करण्यात आली असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी यावेळी केला.