आडत्यांना दररोज करता येणार व्यवहार; पूर्वी निम्मे-निम्मे दिवसाआड व्यापार करण्याचा होता निर्णय
पुणे(प्रतिनिधी) – मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील सर्व व्यापाऱ्यांना दररोज व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्यापासून (मंगळवार, दि. 2) बाजार पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर 10 एप्रिलपासून तिन्ही विभाग बंद होते. त्यानंतर 31 मेपासून बाजार समितीने प्रयत्न करून हे विभाग सुरू केले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार चालविताना काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मास्क, सोशल डिस्टेनिंगबरोबरच गर्दी होऊ नये, यासाठी निम्म्या अडत्यांना व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी उर्वरित अर्धे व्यापारी व्यवहार करणार होते. मात्र, दोन दिवस पाहणी केल्यानंतर सर्वांना कामाला बोलविण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे.
याविषयी प्रशासक बी.जे.देशमुख म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. बाजारात प्रवेश करण्यासाठी खरेदीदारांना पास आवश्यक आहे. दोन दिवसात मोहिम राबवुन हे पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्याला पास हवा आहे. त्यांनी विभागप्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.