पुणे –महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवशी झालेल्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारण्यात चूक झाली. यामुळे या प्रश्नाचा एक गुण विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आलेला आहे.
गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द करून अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल लावला होता. बारावीच्या परीक्षेला ऑफलाइन पद्धतीने सुरुवात झाली आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्याच महाविद्यालयात परीक्षा केंद्राची व्यवस्था केल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच विद्यार्थ्यांना पेपर साठी अर्धा तासाचा वेळही वाढवून देण्यात आलेला आहे. बारावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. पेपर सोपा होता.
मात्र, या पेपरमध्ये एक प्रश्न वेगळ्या पद्धतीचा विचारल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला होता. सिम्पल सेन्टेंन्स बनवा या प्रश्नासाठी देण्यात आलेले वाक्य मुळातच सिम्पल सेन्टेन्स असल्याने हा प्रश्न सोडविताना विद्यार्थी गोंधळून गेले होते. पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी याबाबत शिक्षक, पालक यांच्याशी चर्चाही केली. राज्य मंडळाकडे तक्रारीही करण्यात आल्या. त्याची दखलही राज्य मंडळाकडून तत्काळ घेण्यात आली. प्रश्न विचारताना एक सूचना छपाईमध्ये चूक झाल्याची बाब निदर्शनास आली. यावर मुख्य परीक्षा नियंत्रक व राज्य अभ्यास मंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत या प्रश्नाचा एक गुण विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय झाला.