देशाच्या, राज्याच्या किंवा एखाद्या शहराच्या कोणत्याही भागात एखादी अनुचित घटना घडली की, काही काळ जनजीवन विस्कळीत होते; पण कायदा व सुव्यवस्थेने आपले काम केले की जनजीवन पूर्वपदावर येते, अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होतात. हाच शब्दप्रयोग करोना महामारीच्या काळानंतर आता वापरावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून महामारीची भीती आणि तीव्रता मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून जनजीवन खऱ्या अर्थाने पूर्वपदावर आले आहे. राज्य सरकारनेही अनेक निर्बंध शिथिल केल्यामुळे सर्व व्यवहार खुले झाले आहेत आणि सुमारे दोन वर्षांपूर्वी ज्या प्रकारची सर्वसाधारण परिस्थिती होती त्याच प्रकारची परिस्थिती आता सभोवताली दिसू लागली आहे. 2020 च्या मार्च महिन्यातच भारतात मोठ्या प्रमाणावर करोनाचा शिरकाव झाल्याने प्रथम प्रायोगिक तत्त्वावर आणि नंतर दीर्घकाळासाठी लॉकडाऊनचा प्रयोग करण्यात आला होता. अधूनमधून जरी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले, तरी समाजातील काही घटक कधीच पूर्वपदावर आले नव्हते.
त्याचा मनोरंजन क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. महामारीच्या पूर्वार्धात भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या लसीकरणाचा विषय समोर आला नसल्याने मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढली होती. नंतरच्या कालावधीमध्ये देशात विक्रमी पातळीवर लसीकरणाची मोहीम पार पडल्याने लोकांची इम्युनिटी वाढली आणि बाधितांचे प्रमाणही कमी झाले. साहजिकच ज्या प्रमाणात करोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकारचा फटका जगातील इतर देशांना बसला तेवढा फटका भारताला बसला नाही. या विषाणूची ही लाट अत्यंत अल्प कालावधीत नियंत्रणाखाली आली आणि आता देशात आणि महाराष्ट्रात रुग्णांची संख्या खूपच कमी झाली असल्याने सर्व व्यवहार खुले झाले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रासारख्या शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाऊ लागल्या आहेत. गेली दोन वर्षे घरात बसून शिक्षण घेणाऱ्या आणि ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मानावी लागेल. खऱ्या अर्थाने शिक्षणाची गाडी रूळावर आली हाच याचा अर्थ. महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा आता नेहमीच्या पद्धतीने सुरू झाले आहे.
जरी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा लांबल्यामुळे या अभ्यासक्रमांचे पहिले सेमिस्टर उशिरा सुरू झाले असले तरी नजीकच्या कालावधीमध्ये हे सर्व वेळापत्रकही व्यवस्थितपणे मार्गी लागेल अशी शक्यता आहे. दुसरीकडे ज्या व्यवसायावर लाखो लोकांचे पोट अवलंबून असते तो मनोरंजन उद्योगही आता मार्गी लागला आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये चित्रपट आणि मालिका या घटकांना महामारीचा प्रचंड फटका बसला होता. या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या अनेकांचे रोजगार गेले होते. मालिका असोत किंवा चित्रपट असोत यांच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने हजारो लोकांचे पोट भरले जाते; पण चित्रपटांचे चित्रीकरण रखडल्याने अनेकांचे व्यवसायच बंद झाले होते. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये काही प्रमाणात या सर्व गोष्टी सुरू झाल्या होत्या. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता संपूर्णपणे व्यवहार सुरू झाल्याने मनोरंजन क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळणार आहे. ज्याप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे तो पाहता लोकांसाठी आणि चित्रपट निर्मात्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल.
महामारीच्या पूर्वार्धात जेव्हा चित्रीकरण बंद होते आणि सर्वांना घरात बसावे लागत होते तेव्हा अनेकांना दीर्घकाळ जुन्या मालिका पाहाव्या लागल्या होता. तो अनुभव समोर असल्याने आता जे चित्र दिसतंय ते निश्चितच दिलासादायक मानावे लागेल. शैक्षणिक क्षेत्र सुरू झाले आहे. मनोरंजन क्षेत्र सुरू झाले आहे. मोठ्या शहरातील मॉल्स आणि डिपार्टमेंटल स्टोअर्स व्यवहारही शंभर टक्के क्षमतेने सुरू झाले आहेत. रस्त्यावरील गर्दीही वाढत आहे. पण या सर्व गोष्टी सुरू असताना सर्वसामान्य नागरिकांना आपली सजग नागरिकाची भूमिका निश्चितच विसरता येणार नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशनामुळे जनजीवन जरी पूर्वपदावर आले असले तरी मूलभूत नियमांच्या पालनापासून मात्र मुक्ती देण्यात आलेली नाही, हे महत्त्वाचे आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नका हा मूलभूत नियम कोणालाही विसरून चालणार नाही.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन सध्याच्या गर्दीच्या काळात कितपत होईल याबाबत शंका असल्याने केवळ मास्कच तारणहार ठरू शकेल हे उघड आहे. भारत सरकारने लसीकरणाची मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवून अठरा वर्षांवरील बहुतेकांचे लसीकरण पूर्ण केले असले तरी अजूनही अठरा वर्षांखालील लसीकरणास तेवढा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. अठरा वर्षांखालील हीच लोकसंख्या शाळेत जात असल्याने त्याला महत्त्व द्यायला हवे. शिक्षण क्षेत्रही खुले झाले असल्याने आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अठरा वर्षांखालील मुलांच्या लसीकरणावर प्राधान्याने लक्ष देण्याची गरज समोर येत आहे. अठरा वर्षांवरील लोकसंख्येला लसीकरणाचा खूप चांगला फायदा झाला, हे उदाहरण समोर असल्याने आता अठरा वर्षांखालील वर्गालासुद्धा हा फायदा देण्याची वेळ आली आहे. जर या मुलांच्या मनात किंवा त्यांच्या पालकांच्या मनात काही शंका असतील तर प्रबोधन करून त्या शंका दूर कराव्या लागतील. लसीकरणाची सक्ती करता येणार नाही, असा न्यायालयाने निर्णय दिला असला तरी प्रबोधनाच्या माध्यमातून सर्वांना लसीकरणाचे कवच उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जनजीवन पूर्वपदावर आले असले तरी काही तज्ज्ञांच्या मते नजीकच्या कालावधीमध्ये करोनाचा आणखी एक प्रकार समोर येऊ शकतो.
त्याचा मुकाबला करण्यासाठी तयार राहण्याची गरज आहे. कडक अशा निर्बंधाचा अनुभव भारतातील सर्वच लोकांनी घेतला असल्याने पुन्हा एकदा तो अनुभव घ्यायचा नसेल तर सर्व स्तरावर काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जनजीवन पूर्वपदावर आले असले तरी ही परिस्थिती अशीच ठेवणे सर्वसामान्य नागरिकांच्या हातात आहे. महामारीच्या काळात विस्कळीत झालेला जनजीवनाचा भयानक अनुभव समाजातील सर्वच घटकांनी घेतला असल्याने त्यापासून धडा घेऊनच आता पूर्वपदावर आलेल्या जनजीवनामध्ये प्रत्येकाला आपले दैनंदिन कामे करावे लागणार आहेत. सर्व व्यवहार नेहमीच्या पद्धतीने सुरू झाले त्याचा अर्थ करोना विषाणू संपुष्टात आला असा गैरसमज करून वावरणे धोकादायक ठरू शकते, हा संदेश या निमित्ताने देणे महत्त्वाचे आहे.