निवडणुकीमुळे गावात वातावरण तापले
बेल्हे – रानमळावाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडत असून गावात गुप्त बैठका व पॅनल बांधणी अंतिम टप्प्यात आहे. गावचे वातावरण बदलले असून गावात यंदा परिवर्तन होण्याचे वारे वाहू लागले आहेत.
रानमळावाडी हे लहान गाव असल तरी येथील राजकारण यंदा चांगलेच तापलेले दिसून येत आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये मच्छिंद्र (पप्पू) गुंजाळ यांचा जय मल्हार परिवर्तन सर्वपक्षीय पॅनल व राष्ट्रवादी पुरस्कृत सुरेश तीकोने यांचा खंडेश्वर ग्राम विकास पॅनल यांच्यात दुरंगी लढत झाली होती. ही निवडणूक चुरशीची होऊन यामधे सुरेश तिकोने यांचा विजय झाला होता तर मच्छिंद्र गुंजाळ यांना फक्त 40 मतांनी पराभव पत्करावा लागला होता.
यंदा सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून एकूण 7 जागा व सरपंचपदासाठी एक अशा 8 जगांसाठी तीन वॉर्डमध्ये ही लढत होत आहे. यावर्षी पॅनल बनवण्याच्या हालचाली सुरू असून दुरंगी लढत होणार असल्याची शक्यता आहे. अद्याप पॅनलची नावे समोर आली नसली तरी उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याच्याही चर्चा आहेत.
सर्वपक्षीय पॅनलमध्ये पॅनल प्रमुख मच्छिंद्र गुंजाळ, सीए सावकार गुंजाळ, भाऊ गुंजाळ, कैलास गुंजाळ या चौघांचा पॅनल तर राष्ट्रवादी पुरस्कृत सुरेश तीकोने यांचा पॅनल यात दुरंगी लढत होण्याची चर्चा आहे. परंतु अद्याप दोन्ही पॅनल प्रमुखांचे उमेदवार अंतिम करण्याचे काम जोरात चालल असून यंदाची निवडणूक मात्र लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलल जात आहे.