– कांचन जोशी
शस्त्रे घेऊन लढणाऱ्याचा हेतू आणि वेदना भलेही वेगळ्या असतील. मात्र, शस्त्रे देणाऱ्याचा हेतू कधीच उदात्त असू शकत नाही.
काही दिवसांपूूर्वी इस्रायलवर महाभयंकर हल्ला झाला. लहान मुले आणि महिलांच्याही हत्या करण्यात आल्या. जगभरातील लाखो लोकांनी ही घृणास्पद दृश्ये पाहिली. सोशल मीडियातून ती जगभर सगळीकडे पसरली. मृत महिलांना विवस्त्र करत त्यांच्या शवांची विटंबना केली जात होती. या किळसवाण्या प्रकाराचा जल्लोष केला जात होता, घोषणा दिल्या जात होत्या. एका संघटनेच्या मूठभर लोकांच्या हातात बंदुका होत्या. त्यांनी ते ज्यांना शत्रू मानतात त्यांना खोल जखम दिली होती व त्याचा आनंदोत्सव साजरा केला जात होता. सगळे जग या घटनेकडे नि:शब्दपणे पाहत होते.
केवळ एक-दोन सैनिक ठार झाल्यावर पेटून उठणारा इस्रायल नामक छोटा; पण शक्तिमान देश आपल्या तेराशे लोकांच्या हत्येवर गप्प राहणे शक्यच नव्हते. त्यांनी प्रतिहल्ला केला. गाझापट्टी सपाट करण्याचे काम त्यांनी सुरू केले. आता त्यांच्या कडव्या प्रतिकारापुढे त्यांना चिथावणी देणाऱ्यांची ताकद किती फुटकळ होती ते उघडपणे दिसते आहे. मात्र, इस्रायलला थांबवायला अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. कोणी येणारही नाहीत. ज्यांनी हमासला शस्त्रे दिली तेही आता लांबूनच हा सगळा संहार पाहणार आहेत. सध्या जगात वातावरण असे आहे की दोन जणांची झुंज पाहण्यात लोकांना गंमत वाटते, झुंजवण्यासाठी ते पुढाकारही घेतात. तथापि, त्या झुंजीची झळ आपल्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतात. त्यांना दुसऱ्यांच्या हातात शस्त्रे द्यायची असतात. तो त्यांचा व्यापार असतो. त्यातून त्यांना फक्त नफा हवा असतो.
आज गाझापट्टीवर इस्रायलने सर्व शक्ती पणाला लावून हल्ला केला आहे. मोठ्या इमारती जमीनदोस्त केल्या गेल्या. केवळ धुळीचे काळे ढग आकाशाकडे झेपावताना दिसत आहेत. या सगळ्या संघर्षात अनेक मुले अनाथ होत आहेत, अनेक महिलांच्या डोळ्यात केवळ अश्रूच आहेत. हमासने जेव्हा पहिला हल्ला केला तेव्हाही काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. झाले ते कसे बरोबर आहे अशा प्रतिक्रिया त्यात होत्या. प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये महिलाही होत्या.
इस्रायल शोकमग्न असताना गाझापट्ट्यात आनंद साजरा होत होता. लहान मुले हातात बंदुका नाचवत होती. आता नेमके त्याच्या विरोधात चित्र आहे. आता गाझा बॉम्बहल्ल्यांचे केंद्र बनले आहे. ते इतके भयावह आहे की व्हिडिओत पाहतानाही धडकी भरते. हे सगळे का झाले किंवा होते आहे याचा विचार आता सुबुद्ध लोकांनी आणि धर्माच्या नावावर लोकांना ज्ञान देणाऱ्यांनी करण्याची नितांत आवश्यकता आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा असा नरसंहार होऊ नये म्हणून जागतिक स्तरावर काही संघटनांची बांधणी केली गेली. मात्र, या संघटना आणि त्यांचे नीतिनियम कुचकामी ठरत चालले असल्याचे व जग पुन्हा एकदा मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असल्याचे सूचित होते आहे.
काही मोजके देश आहेत, जेथे अजूनही द्वेष हा त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या उभारणीचा पाया बनला आहे. एक विशिष्ट विचारसरणी जोपासली जाते. मुलांना समज येण्याच्या अगोदरपासून त्या विचारसरणीचा पगडा त्यांच्यावर बसवला जातो. त्यांना विज्ञान, शांतता, प्रगती, जगात घडलेले परिवर्तन आणि मानवाच्या आयुष्यात होत असलेली मोठी क्रांती या सगळ्या बाबी दुय्यम आणि भौतिक सुख वाटत असतात. आपले ध्येय, आपली कथित शिकवण आणि त्यासाठी लढण्याची नव्हे, तर सदैव मरण्याची तयारी हे बिंबवले जाते. पिढ्यान्पिढ्या हे होते आहे. त्यातून जगातल्या अर्ध्या लोकसंख्येतील एक मोठा वर्ग जर याच पगड्याखाली असेल तर जग स्वस्थ कसे असू शकते? कोणी धर्मासाठी, कोणी जमिनीसाठी, कोणी आपल्या हक्कांसाठी लढा देण्याकरता कोणावर तरी हल्ला करतो.
बहुतेकदा हे हल्ले आपल्या शक्तीची मर्यादा ठाऊक असल्यामुळे छुप्या स्वरूपाचे किंवा भ्याड या वर्गात मोडतील अशा प्रकारचे असतात. लहानपणापासून द्वेषाचे बाळकडू देऊन उभी केलेली फौज अशा हल्ल्यांसाठी वापरली जाते आणि वापरले जाणाऱ्यांना यात काही वावगेही वाटत नसते. त्यांना जे दाखवले आहे तेच जग त्यांनी बघितले असते. त्यांचे धर्मगुरू अथवा समुदायातील सूज्ञ वर्ग हे कोणीही त्यांच्यात बदल व्हावा याकरता पुढे येत नाहीत. आज आपण आपल्या शत्रूला कसे रक्तबंबाळ केले याला धर्मयुद्ध मानून त्या उन्मादात जगणाऱ्यांना आपले घर केव्हा जळाले तेही लक्षात येत नाही किंबहुना त्याची त्यांना फिकीरही नसते. यात या प्रत्येक समाज-समुदायातील निरूपद्रवी वर्ग उद्ध्वस्त होतो.
गाझापट्टीची जी अवस्था आज झाली आहे त्याला जबाबदार कोण? हा विचार तेथील नागरिकांनी करायचा आहे. त्यांना काठावरून पाठिंबा देणारे सर्वच माध्यमांत मुबलक भेटतील. तथापि, प्रत्यक्षात युद्धभूमीतली झळ त्यापैकी कोणालाही पोहोचलेली नसते आणि तशी ती पोहोचणारही नाही. कारण याची ते खबरदारी घेतात. जर आपल्यासोबत कोणी चुकीचे घटक राहत असतील, ते काही चुकीचे करत असतील आणि त्यांच्यामुळे कोणाची हानी होत असेल तर त्या लोकांसोबत राहणे हे कधीतरी आपलाही विनाश ओढावून घेणार आहे हे निर्विवाद सत्य आहे. हमास-इस्रायल संघर्षात काही देशांनी जाहीरपणे तर काहींनी सूचकपणे आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
प्रत्यक्षात या दोघांच्या बाजूने युद्धात कोणी उतरण्याची सूतराम शक्यता नाही. समजा, कोणी उतरलेही तरी किमान अमेरिका हा बलाढ्य देश इस्रायल या अन्य लष्करी महासत्तेची साथ सोडणार नाही. जर या दोन महाशक्ती एकत्र येत असतील तर संपन्नतेच्या झोक्यावर हेलकावे खाणारे अन्य कोणतेही देश स्वत:चा वाळवंट करून घेण्यासाठी यांच्या विरोधात जाण्याचे धाडस करणार नाहीत. ते केवळ शस्त्रे देतील आणि दूरून गंमत पाहतील. युद्ध हे खरेतर कोणत्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही आणि दुसऱ्याच्या भरवशावर युद्धाची खुमखुमी बाळगणाऱ्यांनी सदैव हे ध्यानात ठेवावे.