रमेश जाधव
रांजणी – चालू वर्षी निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिका यांचे झालेले नुकसान, त्यामुळे घटलेले लागवडीचे क्षेत्र. यामुळे उन्हाळ कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे. कांद्याचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी सावध चाल अवलंबली आहे. निर्यातबंदीनंतरही कांद्याचे दर तेजीतच असून ते आणखी काही दिवस चढेच राहणार असल्याचे चित्र आहे. तर इराण, इजिप्त, तुर्की, अफगाणिस्तान येथून आयात होणाऱ्या कांद्याचे दर 35 रुपये किलोच्या आसपास राहतील, असे पुणे मार्केटयार्डमधील व्यापारी निलेश थोरात व रामशेठ नरवडे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात सध्या कांद्याला प्रतिक्विंटल कमाल 4500 रुपये, तर किमान दर दोन हजार रुपये मिळत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांली आहे. यातच देशांतर्गत असणाऱ्या मागणीमुळे कांदा भामध्ये अनेक ठिकाणी कांद्याची आवक घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यकाळात कांदा दरात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.
कांदा निर्यातबंदी अगोदर मुंबई येथील जेएनपीटी येथे पास मिळवून निर्यात प्रक्रिया पूर्ण झालेल्या सुमारे दीडशेच्या जवळपास कंटेनरला निर्यातीची परवानगी मिळाली. तरीदेखील दि. 14 सप्टेंबर रोजी पोहोचलेले शंभरहून अधिक कंटेनर अडकून पडले असल्याचे समजते. त्यामुळे निर्णय घेऊन ते कंटेनर निर्यातीसाठी सोडले जावेत, अशी मागणी व्यापारी बांधवांकडून केली जात आहे.
अगोदरच कांदा काढणी दरम्यान झालेला पाऊस तापमान व हवामानातील अधिक आर्द्रता यामुळे कांद्याची टिकवण क्षमता कमी आहे. कांदा अडकून पडल्याने खराब होऊन नुकसान वाढण्याची देखील शक्यता आहे.
उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर सड झाली आहे. त्यात खरीप लागवडी खराब होण्याचे प्रमाण वाढतेच आहे. उन्हाळी कांदा दरात सुधारणा असली तरी 70 टक्के कांदा कमी दरात विकला गेला. त्यात उरलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दर वाढलेले असले तरी शेतकऱ्यांना त्यचा फायदा होण्याची शक्यता कमीच आहे. एकतर खर्चाची बरोबरी होईल किंवा किंचित अधिक मिळेल असे काही चित्र सध्यातरी आहे.
-प्रवीण थोरात, शेतकरी चांडोली बुद्रुक
नवा कांदा दोन महिने उशिरा येणार
नवीन कांद्याची आवक दरवर्षी साधारणतः 15 ऑगस्टनंतर होत असते. मात्र, यंदा नवीन कांद्याची आवक होण्यास साधारणतः दोन महिन्यांचा कालावधी म्हणजेच डिसेंबर महिना उजाडेल असा अंदाज कांद्याचे प्रमुख अडतदार विलास भुजबळ यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, सध्या शेतकऱ्यांकडे जुना कांदा अत्यल्प शिल्लक आहे. त्यामुळे निर्यातबंदी करूनदेखील दक्षिण भारतातून मागणी असल्याने दहा किलोला 250 ते 300 रुपये दर आहेत. सध्या राज्यात कांदा कमी असल्याने परराज्यातून कांदा आवक करण्याची शक्यता होती; मात्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही पावसाने कांदा भिजला आणि नवीन लागवड कमी आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याबरोबरच राज्यातही कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांकडे उपलब्धता कमी
पणन मंडळाच्या अंदाजानुसार खरीप कांद्याची आवक पावसामुळे लांबली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ग्राहकांना साठवणुकीतील उन्हाळी कांद्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. आता मात्र, साठवणुकीतील कांदा निसर्ग चक्रीवादळात आणि काही शिल्लक गेल्या महिन्यात विक्री झाल्याने कांदा अल्पप्रमाणात शिल्लक आहे. काही प्रमाणात कांदा निर्यात देखील झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसल्याने दर चढे राहतील.
तुर्कीतही निर्यातबंदीची शक्यता
तुर्की देशातून आपल्याकडे कांद्याची आयात होण्याची शक्यता असताना या देशातही निर्यातबंदीची तयारी सुरू असल्याचे आयात-निर्यातदार व्यापाऱ्यांनी सांगितले. इराण, इजिप्तचा जो कांदा येणार आहे, तो 15 ऑक्टोबरनंतरच मुंबई बंदरामध्ये दाखल होऊ शकतो. तर अफगाणिस्तानमधून येणधारा कांदा अमृतसरला दाखल होईल. सध्या जागतिक बाजारपेठेतच कांद्याचे दर अधिक असल्याने हा आयात केलेला कांदाही आपल्याला परवडेल अशी स्थिती सध्या तरी नाही.