प्रवाशांचा सवाल : गोसासी ते पूर जीव मुठीत घेऊन प्रवास
वाफगाव – पाऊस पडलारे पडला की रस्त्यावर खड्ड्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. यावर्षी तर हवा तेवढा पाऊसही नाही मात्र गेल्या तीन चार दिवसांत झालेल्या पावसांत गोसासी-कनेरसर-पूर भागात खेड-शिरूर रस्त्यावर फूटांचे खड्डे पडले असून रस्त्याने जाताना कोणता खड्डा चुकवू असे त्रागाने म्हणत प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे; मात्र प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही.
खेड-शिरूर मार्गे नगर-औरंगाबादला जाणारी जड वाहने याच मार्गे जा-ये करीत असल्याने या मार्गावर कायम वर्दळ असते. कनेरसरमधील कंपन्यांमध्ये शिक्रापूर-शिरूर पासून तर पुणे आळंदीमार्गेही कंपनीतील कर्मचारी रात्रीचे जातात येतात. या खड्ड्यांमुळे गेल्या आठवड्यात अनेक दुचाकीस्वार पडले आहेत.
सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.दररोज ये-जा करणारे तसेच एसटी चालक मानसिक ताणाखाली वाहने चालवताना दिसतात. मात्र प्रशासनाने एखाद्याचा जीव जाण्याची वाट न पाहता ताबडतोब खड्डे बुजवावे अशी मागणी कनेरसर, पूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.
कनेरसर येथील यमाईमातेचा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र खड्ड्यांमुळे उत्सवावर परिणाम होणार म्हणून प्रशासनाने लागलीच पावले उचलावी, अशी मागणी माजी सरपंच सुधीर माशेरे, पद्मावती गावड, गोरडे आदींनी केली आहे.
गोसासी ते पाबळपर्यंत रस्ता रुंद करा
नवरात्र उत्सवात अनेक भाविक दर्शनासाठी पायी येत असतात म्हणून गोसासी ते पाबळपर्यंत रस्ता रूंद करण्यात यावा, अशी मागणी सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.