चुका केल्यास गय नाही – आमदार भरणेंची अधिकार्यांना सूचना
इंदापूर – भविष्याचा विचार करुन अधिकार्यांनी योग्य आराखडा तयार करा. तसेच सोबत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे महसूल विभागाने करावेत. पाणीटंचाई आराखडा कामामध्ये कोणीही हयगय करु नका, चुका केल्यास गय करणार नाही. प्रत्येक गावातील नागरिकांनाआगामी काळात पाण्याची अडचण राहणार नाही, असे काम करा अशा सूचना आमदार तथा माजी राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
इंदापूर तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने आणि उजनी धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने यावर्षी पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भरणे यांनी शुक्रवारी (दि. 1) इंदापूर पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय बैठक घेत पाणीटंचाईचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, प्रताप पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, पंचात समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे, अॅड. एल. पी. शिंगाडे, नवनाथ रुपनवर, काकासाहेब देवकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, लाखेवाडीच्या सरपंच चित्रलेखा ढोले यांसह विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
आमदार भरणे म्हणाले की, कोणाचीही गय केली जाणार नाही. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असला तरी सुट्टी घेऊ नका, दोन तीन दिवस अवधी आहे चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करा. परिस्थितीला गांभिर्याने घ्या.विचारपूर्वक आराखडा सादर करुन त्यातून आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल आणि त्यातून उपाययोजना करता येतील, असे त्यांनी नमूद केले.
यादी तयार करावी लागेल की पाणी कोठे मिळेल. त्या बोअर आणि विहिरी अधिग्रहण करणाव्या लागतील. टँकरने पाणीपुरवठा हा शेवटचा पर्याय आहे. गावनिहाय बैठका घेऊ. त्यानुसार त्या-त्या गावचा आराखडा तयार करावा लागेल. हा टंचाई आढावा खुप महत्त्वाचा आहे. तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात असून दिवसाला साडेचार लाख टन चारा जनावरांसाठी लागणार आहे.
– श्रीकांत पाटील, तहसीलदार