शिरूर तालुक्यातील अनेकांना बाधा
लक्ष्मण गव्हाणे
कोरेगाव भीमा – स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी संस्था म्हणजे ग्रामपंचायत. याच संस्थेच्या खुर्चीवर बसण्यासाठी गावागावांत चुरस पाहायला मिळत आहे. या चुरशीत कधीकधी भावकी- भावकित वाद निर्माण होऊन दुफळी झाल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी, शिवसेना, आणि काँग्रेस यांनी तिघांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने वरच्या पातळीवरील नेते जर आपली तत्वे विसरून एकत्र येत असतील तर गावपातळीवर आपण देखील एक व्हायला काय हरकत आहे, हा बहुतांशी सूर ग्रामीण भागात पाहायला मिळाला. त्यातूनच अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
या निवडणुका बिनविरोध होत असताना अनेक तडजोडी करून देवदेवतांच्या, पत्नी, मुलांच्या, आव वडीलांच्या शपथा घेऊन निवडणुका बिनविरोध करून एका ठराविक काळापर्यंत एकाला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यपद देण्यात आले. तर ठराविक काळ संपल्यानंतर दिलेल्या शब्दाला जागून राजीनामा देऊन समोरच्याला संधी देण्याचे कबूल करूनच असंख्य ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र या सर्वाला कुठतरी ग्रहण लागल्याचे दिसत आहे.
समाजकारणाच्या आडून अर्थकारण ?
गेल्या वीस वर्षांत ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या निधींचा निकष बदलला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी ग्रामपंचायतीला मिळत आहे. नागरिकीकरण, औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात झाल्याने कोटींच्या घरात कर मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खुर्चीवर ठाण मांडून बसलेले गाव पुढारी आपली खुर्ची सोडायला तयार नाहीत. समाजकारण करायचं म्हणून खुर्ची सुटत नाही की अर्थकारण जोडलं जातंय म्हणून खुर्ची सुटत नाही, अशी दबकी चर्चा स्थानिकांतून होत आहे.
टोकाचे पाऊल
काही महिन्यांपूर्वी एका प्रतिष्ठित ग्रामपंचायतीच्या सरपंचाने राजीनामा दिल्यानंतर सरपंचाच्या सख्ख्या भावाने आपली कार पेटवल्याचे प्रकरण आहे. नुकतेच शिरूर तालुक्यातील एका गावात खुर्चीसाठी अविश्वास ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न देखील ग्रामपंचायत सदस्यांनी केला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अविश्वास येऊ शकला नाही. एकंदरीत सर्व झटापटी कशासाठी तर खुर्चीसाठी सुरू आहे. या खुर्चीत नक्की दडलंय काय? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही.