आळंदी – आळंदीमध्ये खेड विभाग व हवेली विभाग असा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून परत शहरात अवेळी पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात शनिवारी (दि. 13) रोटेशननुसार खेड विभागात पाणीपुरवठा झाला पाहिजे होता. तो रात्रीपर्यंत झालेला नव्हता.
सलग दोन दिवस पाणी आळंदी- खेड विभागात नसल्याने तिथे पाणीटंचाई समस्या निर्माण होऊन काही नागरिकांनी विकत टँकरद्वारे पाण्याची सुविधा केली तर काहींनी आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या कुपनलिकेचा आधार घेत पाण्याची सुविधा केली. मागील डिसेंबर महिन्यात काही दिवस व सद्यस्थितीत सुद्धा पुन्हा अवेळी पाणीपुरवठा होत आहे. तसेच सलग दोन दिवस पाणी पुरवठा खेड विभागात झाला नसल्याने पुन्हा नागरिक हैराण झाले आहेत.
गुरुवारी आळंदीत पाणी पुरवठा झाल्यानंतर आळंदी गावठाणात अजूनही पाणीपुरवठा झाला नाही याला जबाबदार कोण? यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार? असे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर कुर्हाडे यांनी मत मांडले. तर नगरपालिकेतील कर्मचार्यांना फोन केला तर आज येईल उद्या येईल अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाण्याची वेळ पण सांगत नाही. गावठाणापेक्षा नदीपलिकडे पाणी सोडण्याचे प्रमाण जास्त आहे. गावठाणावर येवढा अन्याय का? असे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मंगेश तिताडे यांनी मांडले होते.