उजनीसाठी हस्तांतरित जमिनींचा प्रश्न जलसंपदा मंत्र्यांकडे मांडणार
वडापुरी – सरकार आपल्या विचाराचे असल्याने विकास कामाच्या बाबतीत आता कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे 27 लाख रुपयांचा विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले हिंगणगाव व आपले कौटुंबिक संबंध असून गेली चार पिढ्या गावातील मतदारानी मतदानरुपी आशीर्वाद दिले आहेत.
उजनी धरणासाठी या गावातील व परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. या जमिनीचा विषय जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येईल. राज्यात ट्रिपल इंजन सरकार असून इंदापूर तालुक्यात निधीची कमतरता भासणार नाही असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
या वेळी इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक स्वप्निल सावंत, सरपंच रसिका आरडे, माजी सरपंच रमेश देवकर, उपसरपंच प्रमिला खराडे, राम आसबे, अमोल इंगळे, बिबीशन देवकर, मोहन देवकर, विजय देवकर, नितीन आरडे, संतोष आरडे, आप्पा आरडे तसेच गावातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
टीका टाळण्याचे प्रयत्न
राज्यात अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यापासून इंदापूरचे राजकारण मात्र पूर्णपणे बदलले आहे. एकमेकांवर टीका करण्याची संधी न सोडणारे आमदार दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील हे आता जाहीर कार्यक्रमात; मात्र नाव घेऊन टीका करण्याचे टाळत आहेत.