धरण क्षेत्रात मुसळधार सुरूच ; पाणीपातळीत झपाट्याने वाढ
भोर – भोर तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून पासाने जोरदार हजेरी लावली असून, हिर्डोशी खोऱ्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी (दि. 23) वरंधा घाट मार्गावरील भोर तालुक्यातील चेरापुंजी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव येथे पावासाची विक्रमी नोंद झाली असून, निगुडघर येथे झालेल्या मुसळधार पावसाची 91 मि.मी.ची नोंद झाली असून, ओढे-नाले दुथडी भरून वाहात असल्याने निरादेवघर धरण भागात 1048 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
धरण 60.07 टक्के भरले आहेत, भाटघर धरण जलाशय भागात 333.44 मि.मी.पावसाची नोंद झाली असून धरण 50.10 टक्के भरले आहे. धरणात 11.78 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. भाटघर धरण हे 23.75 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले धरण आहे, निरादेवघर हे 11.88 टीएमसी क्षमतेचे आहे. या दोनही धरणातील पाणी वीर धरणात संकलित केले जाते.
आज (दि. 24) वीर धरण 48.03 टक्के भरले आहे, तर वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरण 52.14 टक्के भरले आहे. मागीला वर्षी या चारही धारणात 35.476 टीएमसी म्हणजे 73.40 टक्के पाणीसाठा झाला होता.
(दि. 24) भोर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार निगुडघर 91, आंबडे 66, भोलावडे 58, नसरापूर 51, वेळू 50, भोर 44, तर संगमनेर 33, व किकवी 13 मि. मी. पावसाची नोंद झाली असल्याचे नायब तहसीलदार मनोहर पाटील यांनी सांगितले.