आंबेठाण -चाकण औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढल्यामुळे देशातील तसेच परदेशातील मोठ-मोठे उद्योग चाकणला पसंती देत आहेत. उद्योग वाढले की रहदारी वाढते लोकसंख्या वाढते गुन्हेगारी वाढते या सर्वांवर वचक ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर करा, अशी मागणी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रिजच्या वतीने करण्यात आली.
चाकण एमआयडीसीतील 100 पेक्षा जास्त कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक निघोजे येथे आयोजित करण्यात आली होती. नव्याने पदभार स्वीकारलेले पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे यावेळी ही मागणी करण्यात आली. कायदा-सुव्यवस्था राखणे त्याचप्रमाणे लॉक डाऊन सुरू असताना कंपनी प्रशासनाला मोलाचे सहकार्य महाळुंगे पोलीस चौकीच्या माध्यमातून मिळत आहे.
येथील सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुकदेखील करण्यात आले. या बैठकीला पोलिस चौकीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, अराई कंपनीचे संजय निबंध तसेच चाकण परिसरातील 100 हून अधिक कंपन्यांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक परिसरातील गुंडगिरी सहन केली जाणार नाही. त्यांना योग्य तो धडा शिकवू तसेच माथाडी कामगार यांच्या त्रासामुळे जर उद्योगांचे नुकसान होणार असेल तर त्यांची गय केली जाणार नाही.
– कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड