राजगुरूनगरात महामार्गावर प्रवाशांसह रुग्णवाहिकेतील रुग्णांचे मोठे हाल
राजगुरूनगर – शहरात गुरुवारी (दि. 7) सकाळी 8 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली होती. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे वाहतूक कोंडी या दोन्हींमध्ये प्रवाशांचे नोकरदार, विद्यार्थी व रुग्णवाहिकामध्ये अडकलेल्या रुग्णांचे मोठे हाल झाले
राजगुरूनगर शहरात वाहतूक कोंडी दिवसागणिक वाढत आहे. नगरपरिषद व पोलिसांकडून यावर प्रभावी उपाययोजना होत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी, नागरिक, नोकरदार, विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. राजगुरूनगर शहरातून जाणाऱ्या पुणे- नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
राजगुरूनगर शहरातील अरुंद पूल व बेदरकार वाहनचालकांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरूनगर शहरात होणारी वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली आहे. गुरुवारी सकाळी जोराचा पाऊस सुरू होता. येथील महामार्गालगत असलेल्या हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून शहरातून जैन गुरूंची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर महामार्गावर वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. आज सगळ्यात हेवी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
प्रशासन निद्रिस्त
राजगुरूनगर शहरातील हेवी वाहतूक कोंडीतून पुणे-नाशिककडे जाण्यासाठी अडकून राहावे लागले. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आतापर्यंत राजगुरूनगर, चाकणच्या वाहतूक कोंडीत वेळेत उपचारा अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रीय रस्ते विकास विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
बाह्यवळण रखडलेलेच
राजगुरूनगर बाह्यवळण रस्त्याचे काम केली काही वर्षे सुरू आहे तेही पूर्ण होत नसल्याने पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिक याना तासन्तास अडकून बसावे लागत आहे. देशातील सर्व राष्ट्रीय जवळपास सर्वच राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीवर पर्याय निघाला; मात्र राजगुरुनगर शहरातील वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय होत नाही. बाह्य वळण रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने गेली अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रवासी व स्थानिक नागरिकांना सामना करावा लागत आहे.