गडावर प्रथमच होणार यांत्रिक पद्धतीने शेतीची मशागत
भोर – आधुनिकीकरणामुळे शेती क्षेत्रात झपाट्याने बदल होत गेला, तसाच बदल घडविण्याच्या प्रयत्न छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्यची शपथ घेतलेल्या रायरेश्वर गडावरील जंगम परिवाराने हाती घेतला आहे. रायरेश्वर येथील शेतकरी बंधूनी शेती कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करत हा ट्रॅक्टर 4 हजार 694 फूट उंच गडावर नेण्याची किमया यशस्वी करून दाखवली आहे. स्वतःच्या शेतीसाठी रायरेश्वर गडावर ट्रॅक्टर नेण्याचे स्वप्न जंगम बंधूंनी साकारले असून, आजवरच्या इतिहासात रायरेश्वरावर पहिल्यांदाच शेतीसाठी ट्रॅक्टर नेण्यात आला आहे.
किल्ले रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी साधी पायवाटही नसल्याने लोखंडी शिडीचा उपयोग केला जातो. ही शिडी तीव्र उताराची असून, शिडीवरून गडावर जाता-येताना भीती वाटते. शिडीवरून पर्यटक, नागरिकांना मोकळे जाता येता नाही, दमछाक होत असते. अशा परिस्थितीत गडावर ट्रॅक्टर नेऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा संकल्प रायरेश्वर (ता. भोर) येथील अशोक रामचंद्र जंगम आणि रवींद्र रामचंद्र जंगम या दोघा शेतकरी बंधूंनी केला आणि शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी केला.
बुधवारी (दि. 18) खरेदी केलेला हा ट्रॅक्टर रायरेश्वराच्या पायथ्याशी नेण्यात आला. मात्र, पायथ्यापाशी असलेल्या लोखंडी अरुंद शिडीवरून ट्रॅक्टर नेणे शक्यच नव्हते. यामुळे त्यांनी पायथ्यापाशी ट्रॅक्टर उभा करून सोबत आणलेल्या मेकॅनिककडून ट्रॅक्टरचे टायर, इंजिन, मडगार्ड, साठा असे पार्ट व अवजारे ट्रॅक्टरपासून वेगळे केले. वेगळे केलेले पार्ट 20 ते 25 ग्रामस्थांच्या मदतीने शिडीवरून लाकडाच्या मेढी लावून, दोरीने बांधून डोलीने अगदी हळूवारपणे कोणताही धोका न पत्करता अतिशय कठीण परिस्थितीत शिडीवरून पठाराच्या सपाटीवर नेण्यात आला.
ट्रॅक्टर वर नेण्यास लागले दोन दिवस
ट्रॅक्टरचे पार्ट व अवजारे पठारावर चढवायला दोन दिवस लागले. गुरुवारी (दि. 19) शिडीवरून पठारावर गेल्यावर ट्रॅक्टरचे वेगळे केलेले पार्ट जोडण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टर चालू करून गावठाणात नेण्यात आला.
रायरेश्वरावर पहिले चारचाकी वाहन नेण्याचा पराक्रम
रायरेश्वराकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. पायथ्याजवळ असलेल्या लोखंडी शिडीचा वापर ग्रामस्थ व पर्यटक 1992 पासून करीत आहेत. पठारावर सेंद्रिय गव्हाची शेतीबरोबरच नाचणी, वरईची शेती केली जाते. या शेतीची मशागत पारंपरिक मानव व बैलांच्या साहाय्याने केली जाते. जग यांत्रिकीकरणात पुढे जात असताना रायरेश्वरावर मात्र, ट्रॅक्टर नेणे शक्य नसल्याने पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. मात्र, जंगम परिवाराने ट्रॅक्टरच्या रूपाने पहिले चारचाकी वाहन गडावर नेमण्याचा पराक्रम केला आहे.