जांबूत – शिरूर तालुक्याच्या बेट भागातील काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबूत, चांडोह, फाकटे, वडनेर खुर्द आदि गावांतील अनेक विद्युत रोहीत्रांची मोठी दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी विद्युत तारांमध्ये पडलेले झोळ, उघड्या स्वरूपातील फ्युज पेट्या आणि वाकेलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत तारा यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिक तसेच लहान मुले, जनावरे यांचे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरण विभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सद्यस्थितीत महावितरण विभाग यांचेकडून लावण्यात येणाऱ्या भारनियमनासाठी कोणतीही योग्य वेळ दिसून येत नाही. तारांमध्ये पडलेल्या झोळामुळे उसाच्या शेताला आग लागून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. तसेच पावसाळ्याच्या दिवसांत उघड्यावरील फ्युज पेट्या, वाकलेले लोखंडी खांब यामुळे कोणताही अनर्थ घडल्यास एखाद्याचा जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच अचानकपणे विजेच्या संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास अनेकदा शेतकऱ्यांना स्वखर्चाने दुरुस्त्या कराव्या लागतात. काही बिघाड झाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्यास अवाजवी आकारलेल्या वीजबिलासंदर्भात मात्र महावितरणकडून थेट नियम आणि कायद्यावर बोट ठेवले जात असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत.
यंत्रसामग्रीवर गंज; वीज प्रवाहात अडथळे
मागील अनेक वर्षांपूर्वी या भागात उभारण्यात आलेले विजेचे खांब व वीज तारा अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. डीपीमधील फ्यूज, केबल यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या यंत्रसामग्रीवर गंज चढला असून याठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन वारंवार केबल जळण्याचे प्रकार सुरू आहेत. पावसाळ्यात पाणी पडून विजेच्या ठिणग्या बाहेर पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून महिन्यातच विद्युत ट्रान्सफार्मर खराब होण्याच्या घटना वाढल्या आहेत.