राजगुरूनगर – ईपीएस 95 योजनेअंतर्गत पेन्शन रक्कम वाढवली नाही तर आगामी निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारची शिट्टी वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा ईपीएस 95 संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दिला.
समितीचा महामेळावा राजगुरूनगर येथे नुकताच पार पडला, त्यावेळी राऊत बोलत होते. यावेळी विरेंद्र सिंग राजावत, डॉ. पी. एन. पाटील, विलास पाटील, सरिता नारखेडे, सुभाष पोखरकर, छत्तीसगडचे इजाजुर रहेमान, सी. एम. राऊत, इंद्रसिंग राजपुत, तान्हाजी काळभोर, आशा शिंदे, सुभाष थोरात, बी. एन. नारखेडे यांच्यासह देशातील विविध राज्यातील प्रमुख पदाधिकारी, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुतात्मा स्मृती शिल्पस्थळावर राऊत यांनी थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरू, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतुळ्याला पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले. अशोक राऊत म्हणाले की, देशभरात सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या निमसरकारी ,आणि कंपनी कामगाराकडुन पेन्शनच्या नावाखाली प्रत्येकाकडुन 20 लाख रुपये काढुन घेतले; मात्र सेवानिवृत्त झाल्यावर सरकारने 400 ते 1100 रुपये पेन्शन देत आहे.
संघर्ष समितीने या विरोधात देशभरातील निमसरकारी, खासगी कंपन्यात कामगारांना एकत्र करीत हा लढा उभारला असून आता या लढ्याला 99 टक्के यश आले असले तरी 1 टक्यासाठी या सरकारची शिट्टी वाजवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय संघर्ष समिती तुमच्यासाठी लढत आहे. काही जण अफवा पसरवून दिशाभूल करत आहे मात्र प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या खेड तालुका अध्यक्षपदी सेवानिवृत्त एस. टी. कर्मचारी दिलीप कहाणे तर सचिवपदी रामदास चव्हाण यांची निवडीचे पत्र राऊत यांच्या हस्ते देऊन निवडीची घोषणा करण्यात आली.