मुर्टी प्रादेशिक नळ योजनेतून शुद्ध पाणीपुरवठा
मोरगाव – महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत मुर्टी प्रादेशिक नळ योजनेमुळे बारामती तालुक्यातील मुर्टी, मोढवे, मोराळवाडी, वाकी, मगरवाडी, चौधरवाडी, उंबरवाडी, देऊळवाडी ही आठ गावे पिण्याच्या पाण्याबाबत सक्षम झाली. आठ गावांतील डोईवरचा हंडा उतरला आहे. मुर्टीतील 25 वर्षांपासून पाण्यासाठी सुरु असलेली भटकंती थांबल्याची माहिती मुर्टीचे उपसरपंच किरण जगदाळे यांनी दिली.
आठ गावे पिण्याच्या पाण्यासाठी कायमच दुर्लक्षित होती. गेली 22 वर्षे मुर्टीची दर उन्हाळ्यात पहिल्यांदा टॅंकरची मागणी होत होती. महिलांची दाहीदिशा पाचवीलाच पुजली होती. पिण्याच्या पाण्यासाठी नळ योजना येथील तलावावरच अवलंबून होत्या. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे ऐन पावसाळ्यातही पाण्याचा तुटवडा येथे जाणवत होता.
अजित पवार यांचे प्रयत्न
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे येथील महिलांचा गेल्या 22 वर्षांपासूनचा डोईवरचा हंडा उतरलेला आहे. या योजनेनुसार शेंडकरवाडी येथे साठवण तलाव झाला असून मोढवे येथे जलशुद्धीकरण केंद्र झाले आहे. योजनेच्या माध्यमातून या वरील आठ गावांतील वीस हजार लोकसंख्येला शुद्ध जल पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे.
22 वर्षांपासून अधिक वर्षे प्रत्येक उन्हाळ्यात बारामती तालुक्यात मुर्टी गावची पहिल्यांदा टॅंकरची मागणी असायची. मात्र उपमुख्यमंत्री पवार यांच्यामुळे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे.
-किरण जगदाळे, उपसरपंच, मुर्टी.