राज्य शासनाचे मिळाले लेखी आश्वासन
बारामती – राज्य शासनाच्या लेखी आश्वासनानंतर बारामती येथील धनगर आरक्षणासंदर्भात चंद्रकांत वाघमोडे यांचे सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे.
धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते स्व. बी. के. कोकरे यांचे वडील खंडेराव कोकरे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. यावेळी राज्यसभेचे माजी खासदार विकास महात्मे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, तहसीलदार गणेश शिंदे, धनगर समाजाचे विश्वास देवकाते, जी. बी. गावडे, गणपत देवकाते, संजय देवकाते, किशोर मासाळ, आमोल सातकर, बापूराव सोलंकर, कल्याणी वाघमोडे, डॉक्टर नवनाथ मलगुंडे, विठ्ठल देवकाते, सुनील देवकाते, प्रियदर्शनी कोकरे, सुजित वाघमोडे, पोपट धवडे, सचिन गडदे, उपोषणकर्त्ते चंद्रकांत वाघमोडे यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी माळेगाव येथील चंद्रकांत वाघमोडे यांचा लढा सुरू होता. शहरातील प्रशासकीय भवन येथे 13 दिवसांपासून त्यांचे अमर उपोषण सुरू होते. सरकारचा प्रतिनिधी अथवा मंत्री आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे ठाम भूमिका त्यांनी घेतली होती.
त्यांच्या या भूमिकेस बारामती शहर तालुका पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा होता. राज्यातील धनगरबांधवांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली होती. धनगर समाजाचे नेते माजी खासदार विकास महात्मे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
शासनाने धनगर आरक्षणासंदर्भात समिती गठीत केली आहे. अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेल्या तीन राज्यांचा अभ्यास त्याद्वारे केला जाणार आहे. तीन महिन्यांचा कालावधी शासनाने यासाठी घेतला आहे. अशा आशयाचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे उपोषण मागे घेत आहे. उपोषण मागे घेतले असले तरी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय लढा संपणार नाही.
– चंद्रकांत वाघमोडे, उपोषणकर्ते