राजगुरूनगर, दि. 15 (प्रतिनिधी) -खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमा नदीवरील बंधाऱ्यांना अद्यापही ढापे न बसविल्याने यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना लागणार असल्याची भीती भोरगिरी, भिवेगाव परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. या परिसरात असलेल्या बंधाऱ्यांचे ढापे चोरीला गेले आहेत याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
खेड तालुक्यात ठेकेदारामार्फत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर खेड पंचायत समितीचे जलसंधारण विभागाकडून (छोटे पाटबंधारे विभाग) पाणी साठवण्याकरिता ढापे बसविण्यात येतात. खेड तालुक्यात सुमारे 80 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यामध्ये ऑक्टोबरमध्ये पाणीसाठा करण्यासाठी जिल्हा परिषदेकच्या माध्यमातून ग्रामपंचायतीना निधी देण्यात येतो. ठेकेदाराच्या माध्यमातून बंधाऱ्यांचे ढापे बसवले जातात त्यानंतर पाणीसाठा केला जातो. यावर्षी मात्र, दिरंगाई झाल्याने बंधारे अजून कोरडे आहेत तर जलस्त्रोत बंद होत चालल्याने भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भोरगिरी परिसरातील बंधारे अडविण्यात आले नाहीत त्यामुळे नदी पात्रात अजूनही थोडे पाणी वाहत आहे. मात्र, बंधाऱ्याना ढापे न बसविल्यामुळे यावर्षी दुष्काळाचा सामना करावा लागणार का हा प्रश्न शेतकऱ्यांना व नागरिकांना पडला आहे.
नदीचा जलस्त्रोत आटू लागला आहे. त्यामुळे हे बंधारे भरणे आता शक्य नसल्याने नदीकाठचे व बंधाऱ्यातील पाण्यावर रब्बी हंगामात शेती करणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या भागात परतीचा पाऊस कमी झाल्याने नदी ओढे कोरडे झाले आहेत. अनेकदा मागणी करूनही बंधाऱ्याचे ढापे बसविले जात नाहीत.
वर्षांनुवर्षे कनाडोळा
चागंल्या पद्धतीने वेळेत बंधारे अडविल्याने तालुक्यातील जवळपास 600 हेक्टर शेती पिकांना पाणीसाठा उपलब्ध होत असतो. अनेक बंधारे गळती होत असून ते वर्षांनुवर्षे दुरुस्ती केली जात नाहीत. त्यामुळे वर्षांनुवर्षे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
मात्र, बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने ते नादुरुस्त होत चालले आहेत. अनेक बंधाऱ्यांचे ढापे चोरीला जात असून याबाबत संबंधित ग्रामपंचायती दुर्लक्ष करीत आहेत. भोमाळे येथील बंधारा यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेला असून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.