मंचर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांना लोकवर्गणीतून टाटा पंच हे चार चाकी वाहन देण्यात आले असून या वाहनाचा लोकार्पण सोहळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या हस्ते पिंपळगाव खडकी या ठिकाणी झाला.
शेतकर्यांसाठी काम करणारे शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर हे दुचाकीवर जात असताना त्यांच्यावर काही दिवसापूर्वी मंचर कळंब येथे काही हल्लेखोरानी हल्ला करत त्यांना मारहाण केली होती.
या घटनेमुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शेतकर्यांसाठी अहोरात्र काम करणारे प्रभाकर बांगर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधही अनेक ठिकाणी करण्यात आला.
बांगर यांना रात्री अपरात्री बाहेर शेतकर्यांच्या कामासाठी जावे लागते. त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, शेतकर्यांनी तसेच त्यांचा मित्रपरिवार यांनी लोकवर्गणी काढून त्यांना चार चाकी वाहन घेऊन दिले आहे.
या वाहनाचा लोकार्पण सोहळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हस्ते पिंपळगाव या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, सरपंच दीपक पोखरकर, युवासेनेचे सचिन बांगर यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.