राजगुरूनगर – सातकरस्थळ ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यांच्या कडेला कचरा टाकणाऱ्या कचरा फेकूंवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सातकर स्थळ ग्रामपंच्यातीने घेतला असल्याची माहिती सरपंच संजीवनी थिगळे यांनी दिली.
राजगुरूनगर शहराला लागून सातकरस्थळ ग्रामपंचायत आहे. शहराच्या लगत असलेल्या सातकरस्थळ हद्दीत असलेल्या सर्वच रस्त्यांच्या दोन्ही बाजुला नेहमीच कचरा पडलेला असतो. कचऱ्यावर मोकाट जनावरे वावरतात. त्यामुळे कचरा विखुरलेल्या स्थितीत राहुन दुर्गंधी पसरलेली असते. रस्त्यावरून जाताना किळस वाटते. रहदारी वाढत चालली आहे. तसा कचरा वाढला आहे. राजगुरूनगर शहर व सातकरस्थळ परीसरातील अनेक नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. हा कचरा काढताना ग्रामपंचायतीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी व साधनांची कमतरता आहे. वेळोवेळी साफसफाई करून तसेच आवाहन करून उपयोग होत नाही. यापुढे सातकरस्थळ हद्दीतील वाडा रस्ता, जुना वाडा रस्ता, पुर्व भागातील तिन्हेवाडी रोड ते पूर्व रस्ता परिसरात कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवणार आहे. व्यक्ती आढळून आल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वाधिक कचरा वाडा रस्त्यावर संगम गार्डन ते सातकर स्थळापर्यंत टाकला जातो. वडाच्या झाडांचा आधार घेत शहरातील नागरिक कचरा टाकतात त्यामुळे मोठी दुर्गंधी सुटत असते तर प्लॅस्टिकचा कचरा वाऱ्याने सर्वत्र पसरत आहे. दरम्यान वाडा रस्त्यावरील साफसफाई मोहीम रविवारी (दि 18) राबवण्यात आली. यावेळी सरपंच संजीवनी थिगळे, सदस्या वैशाली मारणे, मितेश थिगळे, ग्रामसेवक निलेश पांडे आदी नागरीक, कर्मचारी यावेळी सहभागी झाले होते.
कचरा गाडी आल्यावर कंटाळा करायचा, घरात मोबाइल, टिव्ही पाहात बसायचे आणि वेळ मिळेल तेव्हा चोर पावलाने घरा बाहेर पडुन रस्त्यावर कचरा फेकायचा अशी प्रवृत्ती बाळगणाऱ्या कचरा फेकुवर यापुढे सातकरस्थळ ग्रामपंचायतीकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
– संजीवनी थिगळे, सातकरस्थळ, सरपंच