पुणे – धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे प्रवाशांपैकी तब्बल ६६ जणांचे जीव आरपीएफ (रेल्वे सुरक्ष्ा दल) जवानांनी वाचवले आहेत. मध्य रेल्वेअंतर्गत पाच विभागांतील हे प्रमाण नुकतेच समोर आले. धावत्या ट्रेनमधून चढू नये किंवा उतरू नये, असे आवाहन वारंवार केले जाते.
पण, बऱ्याचदा ट्रेन सुटण्याची भीती किंवा झालेला उशीर यामुळे प्रवासी धावतपळत ट्रेन पकडतात. तर, प्लॅटफाॅर्मवरून रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तोल जाउन अपघात होण्याची शक्यता असते. असे अनेक प्रसंग घडलेदेखील आहेत. काही घटनांमध्ये कौटुंबिक वाद किंवा प्रेमप्रकरणातून ट्रेनखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जातो.
अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी आरपीएफ जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवासी किंवा संबंधित व्यक्तीचा जीव वाचवतात. हे प्रयत्न अनेकदा सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. अशाच घटनांची नोंद मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागाने केली आहे. “मिशन जीवन रक्षक” या मोहिमेअंतर्गत जवानांनी एप्रिल-ऑक्टोबर २०२३ या काळात तब्बल ६६ व्यक्तींचे प्राण वाचवले आहेत.
विभागनिहाय बचावलेले प्राण
मुंबई – १९
पुणे – १५
नागपूर – १४
भुसावळ – १३
सोलापूर – ५
प्रशासनाचे आवाहन
धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना तसेच काही वेळा निष्काळजीपणा करणाऱ्या प्रवाशांचे प्राण धोक्यात येतात. अशावेळी आरपीएफ जवान सदैव सज्ज असतात. प्रवाशांच्या सुरक्ष्ेसाठी हे जवान स्वत:चे प्राण धोक्यात घालतात. त्यामुळे प्रवाशांनी स्वत:सह आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे विभागाने केले आहे.