मंचर – चास (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कडेवाडीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी व लहान मेंढी ठार झाली आहे. मंगळवार (दि. 28) पहाटे ही घटना घडली. बिबट्याच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांनी येथे वन खात्याने पिंजरा लावा अशी मागणी केली आहे.
चास-कडेवाडी येथील पुणे जिल्हा परिषदेचे कृषीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी बाळासाहेब चासकर व सुदाम चासकर यांच्या शेतात मेंढपाळ अण्णा कोळपे यांनी शेळ्या व मेंढ्यांचा वाडा मुक्कामी होता.
मंगळवारी पहाटे मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून शेळी व लहान मेंढी ठार केली आहे. मेंढपाळाचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाळासाहेब चासकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वनपाल शशिकांत मडके व वनसेवक काशिनाथ काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. यावेळी माजी उपसरपंच संतोषकुमार चासकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चास ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वाडीवस्तीवर उस तोड सुरु झाली आहे. त्यामुळे बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत आहे. शेळ्या, पाळीव कुत्री, मेंढ्या बिबट्याने ठार केल्या आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकरी अडचणीत आले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा.
-बाळासाहेब चासकर, कृषीनिष्ठ पुरस्कार विजेते