शाम मानकर यांचे प्रतिपादन; दत्तवाडीतील विजेचा प्रलंबित प्रश्न ५ महिन्यांत धंगेकर यांनी सोडवला
पुणे – आमदार रवींद्र धंगेकर हे लोकांमध्ये रमणारे कार्यकर्ते आहेत. धडाडीने कामे मार्गी लावण्याची, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. असा माणूस जर लोकसभेचा उमेदवार म्हणून पुण्याला लाभला तर पुण्याचा झपाट्याने विकास होईल, असे प्रतिपादन माजी नगरसेवक शाम मानकर यांनी येथे केले. रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना भेटण्याची तयारी ठेवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
दत्तवाडी येथील एमएसईबी ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न पाच वर्षांपासून रखडला होता. पण, या प्रश्नात काळजीपूर्वक लक्ष घालून अवघ्या ५ महिन्यात रवींद्र धंगेकर यांनी हा प्रश्न मार्गी लावला. ४४ केव्ही आणि ३१५ केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर येथे बसवण्यात आले असून याचा लोकार्पण सोहळा शाम मानकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २६) झाला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित या सोहळ्यास आमदार रवींद्र धंगेकर, सुधीर काळे, मनीष सूर्यवंशी, धनेश करपे, प्रदीप ग्रामपाध्ये, अतुल धांनडोरे, पल्लवी पवार, अभिजित बारवकर,अविनाश अडसूळ,राजू नाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मानकर म्हणाले, ज्यांना खरोखर लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, लोकांची कामे करायची आहेत, तो रात्रंदिवस झटतो. असा झटणारा माणूस आपल्याला रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने मिळाला आहे. ते पुणे शहराचे खासदार झाले तर अनेक प्रश्न मार्गी लागतील, याची मला खात्री आहे. त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी आणि मिळाल्यानंतर खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवूया. कारण आपल्याला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. पुण्याचा विकास घडवून आणायचा आहे.