दहा बारा वर्षांपासून डॉक्टरांचा संघर्ष
राजगुरूनगर – राजगुरूनगर शहरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी बॉश चॅसीज सिस्टिम इंडिया प्रा. लिमिटेड कडून सुमारे 3 कोटी रुपयांचा सीएसआर निधी मिळाला आहे. राजगुरुनगर शहरातील नागरिकांसाठी सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र मिळणार आहे. गेली अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेपासून वंचित असलेल्या राजगुरुनगरवासियांना अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व त्यामध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरुनगर शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र नादुरुस्त झाले होते. आरोग्य केंद्राची इमारत पडक्या गळक्या अवस्थेत मोडकळीस आली होती. रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतर हे आरोग्य केंद्र येथील तहसील कचेरीच्या मागे अडगळीच्या शासकीय निवासाच्या 500 चौरस फूट जागेत तीन वर्षांपासून सुरु केले होते. येथे नवीन इमारत बांधण्यासाठी अथवा आहे ती इमारत दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद, राज्य सरकार पुरेसा निधी उपलब्ध करीत नव्हते.
कधी जागेची अडचण, तर कधी निधीच उपलब्ध होत नसल्याने या दवाखान्याच्या इमारतीचे काम रखडले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पासून वंचित राहावे लागत होते. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. ओपीडी वगळता इतर आरोग्याच्या आजारावर उपचार करणे डॉक्टरांना इमारत नसल्याने जिकरीचे होत होते. उपलब्ध असलेल्या जागेत कसे बसे प्राथमिक आरोग्य केंद्र चालवले जात होते नव्हे येथील आरोग्य केंद्रच आजार पडले होते.
राजगुरुनगर शहर व परिसरातील गावांमध्ये झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. येथील आरोग्य केंद्रावर सुमारे लाख-दीड लाख लोक अवलंबून आहेत. त्याच प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. सन 1983 सालापासून शहरातील तहसीलदार कार्यालयाजवळ सुमारे 3 ते 4 गुंठ्यात हे आरोग्य केंद्र सुरु होते. सुरुवातीला समाज मंदिर होते. त्यानंतर तेथे पशुवैद्यकीय दवाखाना झाला. त्यानंतर तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र झाले. ते सुरु असताना ग्रामीण रुग्णालय झाले. नंतर दोन्ही रुग्णालये येथे सुरु होती. पुढे चांडोली येथे सुसज्ज जागेत ग्रामीण रुग्णालय झाले. येथे मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या जागेतच सुरु राहिले.
कालांतराने येथील इमारत धोकादायक झाली. सिमेंटच्या इमारतीवर झाडे उगवली, त्याच्या मुळ्या भिंतीत घुसल्याने दवाखाना मोडकळीस आला. या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या तत्कालीन डॉक्टरांनी वेळोवेळी जिल्हा परिषद व शासकीय यंत्रणेकडे दुरुस्ती साठी व नवीन इमारतीसाठी मागणी केली. मात्र राजकारणाच्या कचाट्यात येथील आरोग्य केंद्र अडकले आणि त्याला अद्यापर्यंत इमारतच नसल्याने शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे मात्र उपचाराअभावी हाल झाले. येथील डॉक्टरांना रुग्णांना उपचार देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. गेली दहा बारा वर्षे हा संघर्ष सुरु राहिला.
तालुका आरोग्य विभागाच्या वतीने चाकण एमआयडीसीमधील कंपन्यांकडे पाठपुरावा सुरूच होता. येथील बॉश चॅसीज सिस्टिम इंडिया प्रा लिमिटेडकडून याची दखल घेण्यात आली. जागा, इमारत दुरुस्ती बाबत आरोग्य विभाग आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात वारंवार चर्चा सुरु राहिल्या. शहरात वाढती लोकसंख्या, सर्वसामान्य नागरिकांचा प्राथमिक उपचाराकडे असलेला कल. आणि उपलब्ध अपु-या सुविधा अपुरा कर्मचारी वर्ग याचा सर्वांगीण विचार करून बॉशकंपनीने शहरातील आरोग्य केंद्रात दररोजची ओपीडी लक्षात घेता आहे या आरोग्य केंद्राला इमारत बांधणीसह एक्सरे, सोनोग्राफी सह आवश्यक सर्व अत्याधुनिक साधन सामुग्री सुविधा उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला. सुमारे 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. जुनी इमारत पाडण्यास सुरुवात झाली असून लवकरच नवीन सुसज्य अत्याधुनिक यंत्रणा असलेले आरोग्य केंद्र येथे बॉश कंपनीच्या माध्यमातून उभे राहणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राला सीएसआर निधी उपलब्ध झाल्याने जुनी इमारत पडण्यास सुरुवात झाली आहे. जुनी इमारत असलेल्या 4 गुंठे जागेत नवीन तीन मजली इमारत बांधली जाणार आहे. बॉश कंपनीच्या सीएसआर निधीतून इमारतींसह प्राथमिक केंद्रात सर्व अत्याधुनिक मशीन आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक सोनोग्राफी, एक्सरे मशीन व विषयक साहित्य देण्यात येणार आहे.
– डॉ. पूनम चिखलीकर, वैद्यकीय अधिकारी
दैनिक प्रभातचा पाठपुरावा
याबाबत दैनिक प्रभात मधून अनेकदा आवाज उठवण्यात आला. राजगुरुनगर प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी यांनी चाकण एमआयडीसीमधील कंपन्यांच्या पुढे आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी प्रस्ताव ठेवले. दुसरीकडे काही लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेकडे निधी साठी मागणी करीत होते. मात्र जागा आणि निधी याबाबत राजकीय कुरघोड्या झाल्या दवाखान्याला निधी मिळत नसल्याने रुग्णांचे मात्र हाल होत राहिले.