राजगुरूनगर -खेड तालुक्यातील 91 ग्रामपंचायतींची सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता राजगुरुनगर येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
ही सोडत वाडा रस्त्यावरील खांडगे लॉन्स मंगल कार्यालयात होणार आहे. नागरिकांनी मास्क, सोशल, डिस्टन्सिंग पाळून योग्य ती खबरदारी घेऊन गर्दी टाळावी, असे आवाहन प्रांत विक्रांत चव्हाण यांनी केले आहे. आरक्षण जाहीर होताच मात्र खऱ्या अर्थाने पॅंनलच्या बाधंणीला वेग येणार आहे. जुने सरपंच, सदस्य आपापल्या ग्रामपंचायतीची अपूर्ण असणारी कामे पूर्ण करण्याबरोबर, अनेक कामे मंजूर होऊन निविदा स्तरावर असल्याने ही कामे आपल्या कारकीर्दीत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
अनेक ग्रामपंचायतीचा कारभार सध्या प्रशासकीय अधिकारी पाहत आहेत. या काळात ग्रामपंचायतीच्या विकास कामांबाबत गटविकास अधिकाऱ्यांसमोर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत विकासकामांना गती देण्याची मागणी होत आहे. विरोधक कामांबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी
गावपातळीवरील वाद निवडणूक आचारसंहिता लागल्याखेरीज संपुष्टात येणार नसल्याचे चित्र अनेक ग्रामपंचायतीमध्ये दिसत आहे. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी चक्क डोळे लावून बसले आहे. दुसरीकडे ग्रामसेवक कामाबाबत उडवाउडवी करुन प्रशासकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नामानिराळे होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. कामे होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज देऊन कामे बंद करण्याचा डाव विरोधकांनी सुरु केल्याने गावागांवामध्ये पुन्हा गटबाजी निवडणुकीच्या तोंडावर उफाळताना दिसू लागली आहे.