ओझर – कुकडी पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी दरामध्ये सहापटीने भरमसाठ, अशी दरवाढ केली असून ही पाणीपट्टीची रक्कम ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून कपात करुन मिळणेबाबत कारखान्यास कळविले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी दरामध्ये वाढ करुन या पाणीपट्टीची वसूली कारखान्यामार्फत ऊस बिलातून करण्याच्या शासनाच्या निर्णया विरोधात ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये प्रचंड विरोध आहे.
वाढीव दराने आकारलेल्या पाणीपट्टीची वसूली शेतकर्यांच्या ऊस बिलातून केली जाणार नाही, याबाबतचे निवेदन अनेक ऊस उत्पादक शेतकर्यांच्या उपस्थितीत उपकार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1 नारायणगाव यांना दिले असल्याची माहिती विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितली.
कुकडी पाटबंधारे विभागास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी ऊस उत्पादकांचे संम्मतीपत्रानुसार विघ्नहर कारखाना पाटबंधारे विभागाने कळविलेल्या वसूली यादीनुसार ऊस उत्पादक शेतकर्यांचे ऊस बिलातून रक्कम कपात करुन ही रक्कम विघ्नहरने वेळोवेळी शासनास अदा केली आहे; परंतु या वर्षीचे हंगामापासून पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीचे दरामध्ये केलेल्या भरमसाठ वाढीला शेतकर्यांचा तीव्र विरोध आहे.
शेतीच्या खर्चामध्ये होत असलेली भरमसाठ वाढ तसेच कांदा निर्यात शुल्कामध्ये केलेली वाढ व निर्यातबंदी, सोयाबिनची आयात, साखर निर्यातबंदी या सर्व बाबींमुळे शेतकर्यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये आधिच खूप घट झाली आहे. त्यामध्ये पाणीपट्टी दरवाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन विघ्नहर कारखान्याने वाढीव पाणीपट्टी दरवाढीनुसार शेतकर्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टी कपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे शेरकर यांनी सांगितले.
तेव्हाच कारखाना सहकार्य करेल
शासनाकडून जुन्या दराप्रमाणे पाणीपट्टी वसूलीची यादी विघ्नहर कारखान्यास आल्यास त्याप्रमाणे ऊस उत्पादकांचे ऊस बिलातून पाणीपट्टीची रक्कम वसूली करण्यास कारखाना सहकार्य करील, असे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.