रांजणी,{रमेश जाधव} – ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात येतोय तशी उसउत्पादकांच्या मनाची लाही लाही होत चालली आहे. वरून तापणारं ऊन पंधरा पंधरा महिने राबून तोडणीला आलेला ऊस आणि ऊस तोडणी यंत्रणा शिवारात येते… तशी शेतकर्यांची अस्वस्थता वाढते आणि सुरू होतो.
ऊसउत्पादकांच्या अस्वस्थतेचा खेळ. वाढी नाही… वाट नाही… अशी अनेक कारणे शोधली जातात आणि शेवट एका वाक्यावर होतो… मालक लावा काडी. एक वर्ष ते दीड वर्षांपासून जीवापाड जपलेल्या उसाला थरथरत्या हाताने काडी लावली जाते. काड काड करत ऊस पेट घेतो. पेटत्या पाल्यासह उसाची राख अस्वस्थता मागे सोडत हवेकडे झेपावते.
काळ्याकुट्ट धुरात ज्यादा उत्पन्नाचे इमले धाडधाड कोसळतात. गेल्या काही दिवसांपासून बहुतांशी हेच दृश्य दिसून येते. संध्याकाळ झाली की उसाला आगी लावायच्या आणि सकाळी चिपाड झालेला उसावर सटसट कोयते चालवत तो ऊस तोडायचा असेच दृश्य सध्या वर्षभर हिरवाई अनुभवलेल्या शिवारापुढे आहे. झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? याचे उत्तर ना साखर कारखान्यांकडे आहे,
ना तोडणी यंत्रणांकडे… जो तो आपले काम करतोय. ऊस तोडणी यंत्रणेला ऊस तोडल्याचे समाधान तर कारखाना व्यवस्थापनाला ऊस मिळाल्याचे. या खेळात ऊस उत्पादकांचा जीव मात्र कासावीस होतोय. वर्षभर वेळेवर पाणी, खते देण्यासाठी दिवस-रात्र जागलेल्या ऊस उत्पादकांची मात्र क्रूर थट्टा होते.
उसाचा हंगाम आता जवळजवळ संपत आलाय. काय करता बघा, असा निर्वाणीचा इशारा आला की हात आपोआपच आगपेटीकडे जात असल्याचे वेदनादायी चित्र उसाच्या शिवारात दिसून येते. यंदाचा ऊस हंगाम कमी ऊस उत्पादनाच्या अंदाजावर सुरू झाला. ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांचा ऊस कारखाने सहजपणे तोडून नेतील अशी आशा होती; परंतु जसा ऊस हंगाम सुरू झाला तशी आशा मावळली.
उत्साहाची जागा निराशेने घेतली. कारखान्याचा माणूस घरापर्यंत येईल हा अंदाज खोटा ठरला. उत्पादकाला फिल्डमन ते कारखान्याच्या अध्यक्षांपर्यंत विणवण्या कराव्या लागल्या. इथेही आर्थिक बाब वरचढ ठरली. तोडणी क्रमांक असतानाही ऊस जात नसल्याने ऊस उत्पादक हबकला. शेवटी कुठून अवदसा आठवली आणि ऊस लावला अशा मानसिकतेत येत ऊस उत्पादकाचे हात आगपेटीकडे वळले. यंदाच्या हंगामाचे हे मनाला पिळून टाकणारे चित्र दिसून येते.
उसाला दर मिळतोय, पण…
दरम्यान ऊस दराचा प्रश्न सुटल्यानंतर तोडणीसाठीचे जे दिव्य ऊस उत्पादकाला करावी लागते याची चर्चा कुठेही फारशी होत नाही. हा प्रश्न वैयक्तिक असल्याने संघटनांचे प्रतिनिधी याबाबत कारखान्यांशी फारसे भांडत नाहीत. झगडा करून दर मिळवायचा आणि उसाची राख करून 30 टक्क्यांपर्यंत नुकसान सोसायचे हे दुष्टचक्र सुरू राहते. हे नुकसान कुठेतरी चित्रात येत नाही याबाबतही संघटनांनी दबाव तंत्र वापरण्याची गरज असल्याची ऊस उत्पादकांची भावना आहे.