सातारा, (प्रतिनिधी) – किसन वीर आणि खंडाळा कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्यांच्या सोसायटी कर्जखाती 30 कोटी रुपये जमा केल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, किसन वीर व खंडाळा कारखान्यात पाच लाख 58 हजार 304 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. दोन्ही कारखान्यांच्या शेतकर्यांच्या नावांवर सोसायटीचे कर्ज होते. त्या कर्जाच्या व्याजाची 30 कोटी रुपयांची रक्कम कारखान्याने संबंधित शेतकर्यांच्या नावे वर्ग केली आहे. त्यामुळे शेतकर्यांना नवीन कर्ज घेणे शक्य होणार आहे.
दोन्ही कारखान्यांना कोणतीही वित्तसंस्था अर्थ पुरवठा करत नसल्याने, कारखाना व्यवस्थापनास साखर विक्री करूनच शेतकर्यांना ऊस बिले द्यावी लागत आहेत. सध्या बाजारपेठेत साखरेचे भाव 33.50 रुपयांवर आले आहे. त्यामध्ये ऊस बिल 3 हजार रुपये आणि इतर खर्च जाता अधिक तोटा होऊन कारखाना अधिक आर्थिक गर्तेत जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संचालक मंडळाने साखर विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. साखरेचे भाव नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता असून, त्यावेळी आपण शेतकर्यांची सर्व ऊस बिले त्यांच्या बँक खात्यांवर जमा करणार आहोत. ऊस उत्पादक शेतकर्यांनी चांगुलपणा दाखवून केलेले सहकार्य यापुढेही करावे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने दोन्ही कारखान्यांना थकहमी मंजूर झाली आहे. त्यामुळे दोन्ही कारखान्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली किसन वीर व खंडाळा कारखान्याला नक्कीच सुगीचे दिवस आणि शेतकर्यांना सोनेरी दिवस येणार आहेत. ऊस बिलांना विलंब होऊनदेखील सभासदांनी कारखान्याच्या संचालक मंडळावर विश्वास दाखवून सहकार्य केल्याबद्दल प्रमोद शिंदे यांनी ऊस उत्पादकांचे आभार मानले आहेत.