सातारा – येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा इतिहास संशोधक संवर्धन संस्था व हिंदवी पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या किल्ला स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरणामुळे फिरत्या चषकाचा मान सातारा तालुक्यातील किल्ल्यांचे गाव असणाऱ्या अंबवडे गावाला मिळाला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते फिरता चषक आणि प्रमाणपत्र अंबवडे गावाला प्रदान करण्यात आले.
अंबवडे गावातील राजेश जाधव, सचिन देशमुख, गुलाब जाधव, उमेश जाधव, अर्जुन धोंडवड व आर्यन जाधव इत्यादी सदस्यांनी हे बक्षीस स्वीकारले येथील हिंदवी पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात, छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, भाजप सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड यांचे स्वीय सहायक अमित चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिज्ञासा विकास मंचचे निलेश पंडित व हिंदवी पब्लिक स्कूलचे संस्थापक अमित कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर येसूबाई फाउंडेशन च्या वतीने विविध गटातील बक्षीसे जाहीर करण्यात आली. वैयक्तिक गटामध्ये प्रथम क्रमांक सचिन पवार, द्वितीय क्रमांक रेहांना बागवान, तृतीय क्रमांक नमिता भिडे यांना मिळाला. सांघिक गटामध्ये प्रथम क्रमांक शिवसंकल्प ग्रुप, द्वितीय क्रमांक हिंदवी पब्लिक स्कूल व तृतीय क्रमांक एस टी कॉलनी विराज शिरोडकर यांना मिळाला.
धैर्यशील कदम म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शिवकालीन किल्ल्यांचे मोठे महत्त्व आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन आणि त्या किल्ल्यांच्या ऐतिहासिक परंपरा याची पुढील पिढीला माहिती होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने किल्ले स्पर्धांचे येसूबाई फाउंडेशनने केलेली नियोजन हे अत्यंत कौतुकास्पद आहे. शिवकालीन किल्ला स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना चांगलाच वाव मिळत आहे. या किल्ला स्पर्धा अशा कलागुणांचे एक सशक्त व्यासपीठ ठरावे.