नांदूर – दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील नांदूर, सहजपूर औद्योगिक भागात करोनाची लागण होण्यास पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. या भागातील रुग्णाची संख्या तसेच इतर माहिती प्रशासन तसेच एका नामांकित कामगार व्यवस्थापनाकडून लपवली जात आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
कामगार, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रशासन खेळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये नांदूर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये अनेकास तर सहजपूर येथेही एकास बाधा झाली होती. सध्या रुग्णसंख्या वाढल्यामुळे बाधित व्यक्तींच्या संपर्कामध्ये आलेल्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रूग्णसंख्या वाढल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाधित क्षेत्रातून कामगार कामाला येत आहेत. एका नामांकित कंपनींशी संपर्क साधला असता फोन उचलला जात नाही किंवा याबाबतची माहिती दिली जात नाही. कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहेत. दौंड आणि हवेलीतून कामगार येत असल्याने संसर्ग वाढला आहे. त्यामुळे परिसरातील गावकरी संतापले आहेत. नांदूर परिसरामध्ये कंपनीत मागीलवेळी करोना संसर्गाचा उद्रेक झाला होता.
परिसरातील अनेक गावांमध्ये संसर्ग पसरला होता. आत्ता देखील कंपनीमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांना उपाययोजना करणे गरजेचे आहे. अधिकारी, आरोग्य विभाग, आशावर्कर्स, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कंपन्यांकडून माहिती दिली जात नाही, काही कंपन्यांमध्ये उपाययोजना फक्त कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे.
नांदूर औद्योगिक परिसरामधील कंपन्यांकडून करोना रुग्णांबाबत कोणतीही माहिती माझ्याकडे आलेली नाही. कंपन्यांकडून माहिती न मिळाल्यास त्या कंपनीवर ती योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल.
– निलेश धारकर, ग्रामसेवक, नांदूर